‘टीईटी’संदर्भात चौकशी करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : राज्यातल्या लाखो तरुणांना बुडवणारा शिक्षक पात्रता परीक्षा (TET) घोटाळा मविआ सरकारच्या काळात झाला. यात सनदी अधिकाऱ्यांपासून मंत्रालयातील अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांना अटक झाली. हा TET घोटाळा अपात्र कंपन्यांना पात्र केल्याने झाला आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, यामध्ये दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले
राज्यात टीईटी परीक्षेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी आज विधानसभेत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
अब्दुल सत्तारांच्या कोणत्याही मुलीला टीईटी अंतर्गत नोकरी लागलेली नाही…
मंत्री अब्दूल सत्तार यांच्यावर झालेल्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले, स्वतःच्याच काळातील घोटाळ्यांचे आरोप करणारा असा विरोधीपक्ष मी आजवर कधी पाहिला नाही. अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींना या गैरव्यवहारातून नोकरी लावल्याचे म्हटले जात आहे. मात्र, त्या परीक्षेत सत्तार यांच्या मुलींना अपात्र ठरवले असून त्यांच्या कोणत्याही मुलीला टीईटी अंतर्गत नोकरी लागलेली नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सत्तार यांची पाठराखण केली आहे.