‘मातोश्री’ हा खोट बोलण्याचा कारखाना – संजय निरूपम
मुंबई : मातोश्रीमध्ये खोटे बोलण्याचा एक कारखाना आहे. मातोश्रीवर रोज एक खोटा विषय तयार केला जातो आणि त्यांचे खासदार संजय राऊत तो समाजात पसरवतात. त्यांनी आता तरी खोटे बोलणे थांबावावे, अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरूपम यांनी शिवसेना ठाकरे गटाला टोला लगावला आहे. सरकारच्या चुका दाखविणे हे विरोधकांचे काम आहे खोट्या बाबी पसरवणे हे नाही, असेही त्यांनी सुनावले आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून रोज सरकार आणि सत्ताधारी यांच्या बद्दल अपप्रचार केला जात आहे. असे वागणे त्यांनी आता थांबवावे. अन्यथा महाराष्ट्राची जनता त्यांना कदापि माफ करणार नाही, असेही निरुपम म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी बनवलेली मातोश्री 2 ही घोटाळ्यातून बनलेली आहे. हा घोटाळा लवकरच जनतेसमोर उघड करून दाखवू, असा इशाराही त्यांनी दिला.
आदित्य ठाकरे यांनी माफी मागावी
वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मतदान यंत्र हॅक करण्यात आल्याचे वृत्त एका वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले होते. मात्र, या वृत्तांत तथ्य नसल्याचे मान्य करून या वृत्तपत्राने माफी मागितली आहे. आदित्य ठाकरे यांनी देखील मतदान यंत्रात फेरफार करून रवींद्र वायकर निवडून आल्याचा आरोप केला होता. त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांनी देखील माफी मागावी, अशी मागणी ही निरुपम यांनी केली आहे.
भारताला समृद्ध लोकशाहीची परंपरा आहे. 60 ते 65 कोटी मतदार असलेल्या या देशात निवडणूक आयोग निवडणुकीची यंत्रणा सक्षमपणे राबवित आहे. या कामाचे कौतुक करण्याऐवजी विरोधक निवडणूक आयोगाची बदनामी करीत आहेत. हे असंवेदनशीलतेचे लक्षण आहे, अशी टीकाही निरुपम यांनी केली.
