मुंबई केंद्रशासित करा; कानडी मंत्री पुन्हा बरळले
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीत बोलावून महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद मुद्द्यावर काहीही न बोलण्याची तंबी दिली आहे. तरी देखील कानडी मंत्र्यांची मुक्ताफळे सुरूच आहेत. यापूर्वी महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद प्रश्नी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई वारंवार चिथावणीखोर वक्तव्य करत आले आहेत. त्यांच्या पाठोपाठ आता कर्नाटकातील उच्च शिक्षण मंत्री सी. एन. अश्वत्थ नारायण यांनी आता थेट मुंबई केंद्रशासित करा, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमाभाग केंद्रशासित करा, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील उच्च शिक्षण मंत्री सी. एन. अश्वत्थ नारायण यांनी नवीन केंद्र शासित प्रदेश करायचा झाला तर मुंबईलाच सर्वात आधी केंद्रशासित करावे लागेल. तसेच मुंबईत किती मराठी माणसं राहतात असा प्रश्न विचारला तर उद्धव ठाकरे यांना उत्तर देता येणार नाही. ठाकरे यांनी कोणतेही विधान करण्यापूर्वी थोडा विचार करावा. मुंबईत 20 टक्के कानडी नागरिक राहत आहेत. त्यामुळे नवा केंद्रशासित प्रदेश करायचा झाला तर मुंबईलाच करावा लागेल, असे नारायण म्हणाले.
दरम्यान, नारायण यांच्या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दांत निषेध केला आहे.
