मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची रोहन सुरवसे पाटील यांची मागणी
पुणे: राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड महोत्सवासाठी कृषी खात्याला पाच कोटी रुपये वर्गणी गोळा करण्याचे तोंडी आदेश दिले असल्याचे खात्रीशीर वृत्त समजले असून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी पोलिस आयुक्त सो पुणे
यांना निवेदन सादर करीत केली आहे. प्रसार माध्यमांना माहिती देताना रोहन सुरवसे पाटील म्हणाले की, १ ते १० जानेवारी दरम्यान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघ असलेल्या सिल्लोड महोत्सव आयोजित करण्यात आला असून या महोत्सवासाठी कृषी खात्यातील अधिकाऱ्यांना कोठ्यावधी रुपयाची वर्गणी जमा करण्याचे आदेश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्याने कृषी विभागात खळबळ उडाली आहे
कृषी महोत्सवात प्रवेश व्हीआयपी प्रवेशासाठी चार प्रकारचे पासेस तयार करण्यात आले असून प्लॅटिनम साठी पंचविस हजार, डायमंड साठी पाच हजार, गोल्ड साठी दहा हजार , सिल्वर प्रवेशिकेसाठी पाच हजार रुपये असे चार प्रकारचे प्रवेशिका कृषी विभागाकडून सर्व जिल्हा कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात पाठवल्या आहेत. या प्रवेशिका प्रत्येक तालुका कृषी अधिकारी मार्फत तालुक्यातील खते आणि किडकनाशी बियाणे विक्रेत्यांना द्यायचे असून त्या बदल्यात पैसे गोळा करून त्या कार्यालयाकडे जमा करण्याचे तोंडी सूचना दिले असल्याची माहिती मिळत आहे.
अब्दुल सत्तार यांनी कोट्यावधी रुपये कृषी महोत्सवासाठी मागितल्याने कृषी आयुक्तालयात खळबळ उडाली असून, सदर बाब अतिशय गंभीर असून कृषि मंत्री यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे.म्हणून सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.
