भारतीय स्वातंत्र्यात अनेक क्रांतिकारकांचे योगदान – नंदू उर्फ सदानंद फडके
हुतात्म्यांच्या साक्षीने पाचवे राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
पुणे : राष्ट्रभक्ती करिता जे साहित्य संमेलन घेतलं त्यातील मूलभूत गाभा म्हणजे साहित्य निर्मिती. अंतिम उद्दिष्ट राष्ट्र बलवान करणे आहे, व त्याच्या निर्मितीसाठी असतील त्या साधनांच संकलन म्हणजे साहित्य संमेलन. साहित्य हा शब्द मर्यादित राहता कामा नये. भविष्याचा वेध घ्यायचा असेल तर भूतकाळ विसरून चालणार नाही. भारतीय स्वातंत्र्यात अनेक क्रांतिकारकांचे योगदान राहिला आहे. ज्यावेळी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तो कालखंड देखील विचारात घेण्याची ची गरज आहे, असे विचार संमेलनाध्यक्ष नंदू उर्फ सदानंद फडके यांनी मांडले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ने मराठी साहित्याचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान या विषयास वाहिलेलं, देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने प्रणित कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे. मराठी भाषा संवर्धन समिती, पुणे मनपा, चंपियन ॲकॅडमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात हे एक दिवसीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी साहित्य, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या केदार टाकळकर यांना कै. उर्मिलाताई कराड (साहित्यिका व कवयित्री) यांच्या नावे दिला जाणारा प्रथम जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला तर शैक्षणिक क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणारे राजकुमारसिंह सोलंकी यांना मानपत्र देण्यात आले. यावेळी अध्यक्ष अखिल भारतीय साहित्य संमेलन पुणे श्याम भुर्के, उद्घाटक राजकुमारसिंह सोळंकी, ज्येष्ठ विचारवंत शितल पाटील, सह आयुक्त शिवाजी दौंडकर, कार्याध्यक्ष नंदिनी शहासने आदी मान्यवर उपस्थित होते.
संमेलनाच्या उद्घाटनसत्रात भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्मे, पर्यावरण या विषयावरील १६ पुस्तकांचे व स्मरणीकेचे प्रकाशन करण्यात आले. सकाळी सव्वाआठ वाजता क्रांतिकारकांच्या विविध वेशभूषेतील मुले, विद्यार्थीनी व महिलांनी महाराष्ट्रातील हुतात्म्यांची १२० छायाचित्रे गळ्यात अडकवून ग्रंथदिंडीत सहभाग घेतला. यामुळे ग्रंथ दिंडीचे वातावरण भारावून गेले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी जोशी यांनी केले तर प्रास्ताविक नंदिनी शहासने व आभार चंद्रकांत शहासणे यांनी मांडले.