गूढ साहित्य लेखनापेक्षा बालसाहित्याची निर्मिती अधिक आव्हानात्मक – भारत सासणे
पुणे : बालसाहित्याची परंपरा खूप मोठी आहे, पण बालसाहित्यातून गेल्या काही काळात अद्भूत रसाला वजा केले गेले आहे. बालसाहित्याची दोन प्रकारात निर्मिती झाली; एक संस्कारक्षम तर दुसरे मनोरंजनात्मक. बालसाहित्याची निर्मिती करणे ही अवघड गोष्ट आहे. ते लिहिण्यापूर्वी स्वत:ला तपासून पहावे लागते. बाल मानसशास्त्राचा अभ्यास करावा लागतो. गूढ साहित्य लेखनापेक्षा बालसाहित्याची निर्मिती करणे आव्हानात्मक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कथाकार, उदगीर येथे होत असलेल्या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष भारत सासणे यांनी केले.
विवेक साहित्य मंचतर्फे सासणे यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी विविध प्रश्नांना आपल्या अनोख्या शैलीत उत्तरे दिली. तत्पूर्वी सासणे यांचा मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार दिलीप करंबेळकर, विवेक साहित्य मंचचे मुख्य कार्यवाह महेश पोहनेरकर उपस्थित होते. सासणे यांच्याशी डॉ. अर्चना कुडतरकर यांनी संवाद साधला.
माझ्या साहित्यात गूढत्व आहे पण त्या रहस्यकथा नक्कीच नाहीत, असे सांगून सासणे म्हणाले, लेखकाला लिखाणाचे आव्हान स्वीकारावे लागते, त्याकडे चिंतनशिलतेने बघावे लागते. बालसाहित्याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सासणे म्हणाले, मधल्या काळात बालसाहित्याची निर्मिती कमी प्रमाणात झाली आणि जी झाली त्यावर परदेशातील बालसाहित्याचा ठसा मोठ्या प्रमाणात होता त्यातून गोट्या, फास्टर फेणे, बोक्या सातबंडे अशा पात्रांची निर्मिती झाली. बालसाहित्याकडे प्रतिभावान लेखकांनी वळले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
लघुकथेकडून दीर्घकथेकडे कसे वळलात या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, माझ्या पूर्वी अनेकांनी दीर्घकथा लिहिलेल्या आहेत. लघुकथांमधून विषय मांडण्यात मर्यादा येत असल्याने दीर्घकथांची निर्मिती झाली.
साहित्यिकाने ठोस भूमिका घ्यावी, असे आग्रही मत नोंदवून सासणे म्हणाले, हा वाद फार जुना आहे. भूमिका घेताना लेखकाची बांधिलकी असणे गरजेचे आहे. ही भूमिका राजकीय, सामाजिक असेल असे नाही. लेखकाला भूमिका असते, ती असावी, त्याने ती सुस्पष्टपणे मांडावी. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून मी जेव्हा लिहितो तेव्हा माझी बांधिलकी त्या माणसाशी असते. लेखकातील विवेक-करूणा नोकरीत आणली तर नोकरीतील प्रशासकीय शिस्त लिखाणात आणली असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.