अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे काटेकारेपणे करा – मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार
मुंबई : राज्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. शेती पिकांसोबतच इतर बाबींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे हे लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने काटेकोरपणे पंचनामे करावेत कोणताही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहू नये याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केल्या.
राज्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यांचा आढावा आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला.यावेळी मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्याबरोबरच राज्यातील सर्व जिल्ह्यांचे विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
विजय वडेट्टीवार म्हणाले,राज्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. अजूनही पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.आज रोजी जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे केल्यानंतर मोठ्या प्रमाणात नुकसानीचे आकडे वाढत आहेत. विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी प्रांताधिकारी व तहसिलदार यांनी काही प्रातिनिधीक ठिकाणी जाऊन पंचनामे केले जात आहेत अशा ठिकाणांची पाहणी करावी. कोणतीही नुकसानग्रस्त व्यक्ती मदतीपासून वंचित राहू नये ही खबरदारी घ्यावी.तसेच केलेल्या पंचनाम्यांची शहनिशा करण्यात यावी. शेती, घरे, पशुधन, फळबागा, शेत जमीन खचलेली क्षेत्र, दरडी कोसळलेल्या शेत जमिनी, ग्रामीण रस्ते, शाळा, शासकीय इमारती, पुल, कॅनाल, फुटलेले तलाव याबाबत तसेच इतर बाबींची नुकसानीची माहिती शासनाला सादर करावी अशा सूचना वडेट्टीवार यांनी दिल्या.
विजय वडेट्टीवार म्हणाले, ज्या ठिकाणी तातडीने मदत आवश्यक आहे अशा वेळी राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची मदत तातडीने घेण्यात यावी. आपत्तीमध्ये मृत व्यक्तींच्या वारसदारांना तातडीची मदतीचे वितरणही तात्काळ करण्यात यावे.दरड कोसळण्याची अथवा अशी ठिकाणे असतील अशा परिसरातील नागरिकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे.कोरोना परिस्थीतीत स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन या नुकसानीच्या पंचनामे करण्याच्या कामाला प्राधान्य द्यावे. एनडीआरएफच्या मदत निकषात वाढ करण्याबाबत राज्य शासनाकडून पाठपुरावा सुरू आहे.शासनाकडून जुलै महिन्यात जाहिर केलेल्या मदतीचे वाटप करण्याबाबतही लवकरच निर्णय होणार आहे .
