पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूचा कहर; १४ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांचे कठोर कारवाईचे आदेश
पुणे प्रतिनिधी :
पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे मोठी दुर्घटना घडली असून गेल्या दोन दिवसांत तब्बल १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे दोन्ही शहरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांशी चर्चा करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन तपास करण्यासोबतच कोणालाही पाठीशी घालू नये, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून संयुक्त तपास सुरू असून अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नल विरखा सिंग याला अटक करण्यात आली असून त्याच्यासह आणखी आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींवर गंभीर कलमे लावण्यात आली असून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पोलिसांकडून रात्रभर अवैध दारू अड्ड्यांवर कारवाई सुरू होती. विषारी दारू नेमकी कुठे तयार करण्यात आली आणि ती कुठून पुरवली गेली याचा तपास यंत्रणा कसून शोध घेत आहेत.
