केवळ आश्वासनाने थांबणार नाही आंदोलन: जरांगे पाटील यांचा इशारा
राज्य सरकारचे शिष्टमंडळ चर्चेसाठी अंतरवली सराटी येथे रवाना
मुंबई प्रतिनिधी
मराठा आरक्षण संदर्भात प्रलंबित मागण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या उपोषणाच्या इशाराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी अंतर्वली सराटी येथे रवाना झाले आहे. मात्र, यावेळी केवळ आश्वासन पदरात पाडून आंदोलन थांबणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
कुणबी नोंदी आढळलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात टाळाटाळ होत असल्याचा जरांगे पाटील यांचा आरोप आहे. यासह अन्य काही मागण्यांसाठी जरांगे पाटील उद्यापासून आमरण उपोषण करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजधानी मुंबईत घडामोडींना वेग आला असून उपोषण मागे घ्यावे यासाठी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, आमदार बच्चू कडू यांचा सहभाग असलेले शिष्टमंडळ अंतरवली सराटीमध्ये दाखल झाले आहे.
यापूर्वी सरकारच्या आश्वासनांना मराठा समाजाने आदरपूर्वक स्वीकारले. मात्र, आधी तीन वर्ष नंतर दहा महिने सरकारने केवळ आश्वासने देऊन समाजाला झुलवत ठेवले. केवळ आश्वासने देऊन समाज मोठा होत नाही. उद्यापासून सुरू होणारे आंदोलन केवळ आश्वासनासाठी मागे घेतले जाणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
या सरकारला मराठा समाजाने सत्ता दिली आहे. मात्र, स्वतः वातानुकूलित कक्षात बसणाऱ्या सरकारने मराठा समाजाला आगीच्या खाईत लोटले आहे. हे सरकार संवेदनाहीन आहे. मात्र, मराठा समाज देणारा आणि मिळवणारा ह आहे, हे सरकारने विसरू नये, असा इशारा ही जरांगे पाटील यांनी दिला.
