आधुनिक शिक्षण पद्धतीत ज्ञानरचनावादाला महत्त्व- डॉ.न.म.जोशी
अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे गरजू विद्यार्थ्यांना १ हजार फुलस्केप वहयांची मदत
पुणे : विद्यार्थ्यांनी स्वत: ज्ञाननिर्मीती करावी, अशी एक प्रणाली आहे. याच आधुनिक शिक्षण पद्धतीत ज्ञानरचनावादाला महत्व आहे. यासाठी शैक्षणिक साहित्याचा विशेष उपयोग होतो. गरजू व गरीब मुलांना असे शैक्षणिक साहित्य विपुल प्रमाणावर वापरता येत नाही. एवढेच नव्हे, तर आवश्यक तेवढेही साहित्य त्यांच्याजवळ नसते, त्यामुळे ते साहित्य त्यांना देणे यातून समाजातील दानशूरांची संवेदनशीलता व सामाजिक जाणीव दिसून येते, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.न.म.जोशी यांनी व्यक्त केले.
अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे गरजू विद्यार्थ्यांना १ हजार फुलस्केप वहयांची मदत देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन मंडईमध्ये करण्यात आले होते. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आॅनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम झाला. यावेळी दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, ट्रस्टचे विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, नितीन जाधव, विश्वस्त अध्यक्ष राहुल सुर्यवंशी, विजय जाधव, सुधीर साकोरे, योगेश निकम, दिनेश पिसाळ, अमर खंडागळे, प्रणव तावरे आदी उपस्थित होते.
डॉ.न.म.जोशी म्हणाले, अनेकदा माणूस काहीतरी घेतो, पण तेवढयाच प्रमाणात देणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. देणे या क्रियापदाला आपल्या जीवनात फार महत्व आहे. जगण्याकरीता घेणे हे महत्त्वाचे आहेच, पण आपल्या हातातून आपण शक्त तितके समाजाला दिले पाहिजे. कोणत्याही संकटातून दूर जाणे आपल्या हातात असते. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडणे किंवा त्यामध्ये राहणे हे आपल्याच हातात आहे. चांगल्या उपक्रमांकरीता समाजाचे आणि परमेश्वराचे आशिर्वाद असतात. त्यामुळे असे उपक्रम व्हायला हवे.
निवृत्ती जाधव म्हणाले, ज्यांना मिळत नाही, त्यांना आपण समाजाचे देणे लागतो या भावनेने परतफेड करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. आई-वडिलांनी आपल्याला कसे वाढविले, कसे शिकविले हे लक्षात ठेऊन मोठे झाल्यावर इतरांना मदत करावी. त्यातूनच आपल्यावर लहानपणी झालेले संस्कार दिसून येतात, असेही त्यांनी सांगितले. जतीन पांडे यांनी सूत्रसंचालन केले.
