समाजात ओळख निर्माण करण्याचे कला हे मोठे साधन ; आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे मत
व्हिनस ट्रेडर्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या व्हिनस आर्टफेस्ट २०२६ या प्रदर्शनाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात विविध श्रेणीतील चित्रांचा समावेश आहे. २०१३ पासून व्हिनस ट्रेडर्स यांच्याकडून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. घोले रोडवरील राजा रविवर्मा गॅलरीमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला प्रसिद्ध कार्टूनिस्ट चारुहास पंडित, व्हिनस ट्रेडर्सचे संचालक सुरेंद्र करमचंदानी उपस्थित होते.
चित्रकार होण्याची माझी खूप इच्छा होती, त्यासाठी मी कोर्स देखील केले. निसर्गाच्या बरोबर राहून चित्रकला करण्याची आपली खूप इच्छा असून त्यासाठी प्रयत्न करत असल्याचे शिरोळे यावेळी म्हणाले.
कलेमध्ये अदभूत अशी शक्ती आहे. त्याच्याबरोबर राहिल्याने आपल्यामधील आत्मविश्वास वाढण्यास निश्चितपणे मदत होते. आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्यामध्ये असणारे कलेचे गुण जोपासण्यासाठी आपण वेळ काढण्याची गरज आहे. कलेच्या माध्यमातून आपल्याला समाजामध्ये वेगळी ओळख निर्माण होण्याचे काम होते. त्याचा आपल्यावर सकारत्मक परिणाम होतो. कला जपण्यामध्ये सातत्य ठेवले तर त्याचे चांगले फायदे होतात. इतकेच नाही तर आपले व्यक्तीमत्व घडवण्यामध्ये त्याचे काम मोठे ठरते असे शिरोळे यांनी नमूद केले.
प्रदर्शनात सहभागी झालेल्या कलाकाराने चित्र समाधी लावून काढलेले आहे. सार्वजनिक जीवनात कलेला असणारे महत्व मोठे असल्याचे चारुहास पंडित यावेळी म्हणाले.
कलेमुळे नव्या पिढीवर चांगले संस्कार घडत असून त्यामधून त्यांना प्रोत्साहन मिळत आहे. सध्याची तरुण पिढी ही कलेच्या क्षेत्रात खूप उंच दर्जाचे काम करत आहे, त्यामुळे भारतचे भविष्य उज्वल असल्याचे पंडित यावेळी म्हणाले.
या प्रदर्शनादरम्यान १३ जून रोजी सायंकाळी ४.३० वाजता एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन व व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये या परीक्षांचे महत्त्व, तयारीची दिशा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये त्यांचा होणारा उपयोग याबाबत तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करतील. १४ जून रोजी “युनिक पुणे ट्री पेंटिंग” हा सामूहिक कलाउपक्रम इथे राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये यामध्ये अभ्यागत, कलाकार आणि कला रसिक एकत्रितपणे सहभागी होऊन पुण्याच्या सर्जनशीलतेचे आणि सामूहिक सहभागाचे प्रतीक असलेली भव्य कलाकृती साकार करणार आहेत.विनया देसाई यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.
