Sunday, August 30, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

अवघ्या दोन तासांत संपूर्ण पालखी मार्ग केला स्वच्छ

 

पुणे, दि. ९ : जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील संपूर्ण पालखी मार्गाची स्वच्छता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने नियोजनबद्ध आणि युद्धपातळीवर राबविलेल्या मोहिमेतून पूर्ण केली. पालखीचे शहरात आगमन होण्यापूर्वी तसेच प्रस्थानानंतर अवघ्या दोन तासांत पालखी मार्ग आणि परिसराची संपूर्ण स्वच्छता करून शहरातील स्वच्छता व्यवस्था पूर्ववत करण्यात आली.

वारीदरम्यान शहरात मोठ्या संख्येने येणाऱ्या वारकरी बांधवांच्या सुविधा आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने पालखी मार्गावर तात्पुरती स्वच्छतागृहे, स्नानगृहे तसेच आवश्यक स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या सुविधांची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि देखभाल आरोग्य विभागामार्फत करण्यात आल्या होत्या.

या मोहिमेत महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सलग काम करत पालखी मार्ग स्वच्छ ठेवला. विविध स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून महापालिकेच्या प्रयत्नांना बळ दिले.

सीवायडीए, बिसलेरी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल गव्हर्नमेंट, संस्कार प्रतिष्ठान, ईसीए, प्रतिभा कॉलेज, संजीवनी स्वयंसेवी संस्था, अंकुश फाऊंडेशन, ज्ञानगंगा फाऊंडेशन, अल्फा फाऊंडेशन, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, म्हाळसाकांत विद्यालय, ह्यूमन राईट्स असोसिएशन, संत निरंकारी मंडळ, निर्मल वारी, यशस्वी ग्रुप, आरंभ महिला बचत गट, यशोधरा महिला बचत गट, पिंची संस्था, निर्मल फ्लॉवर फाऊंडेशन, लाईट हाऊस कम्युनिटी फाऊंडेशन, उमंग फाऊंडेशन, गुणवंत कामगार मंडळ, पितृछाया ट्रस्ट आणि एस.एन.बी.पी. कॉलेज आदी संस्थांनी या मोहिमेत सहकार्य केले.

याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे म्हणाले, “वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे. वारकरी बांधवांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने सर्व यंत्रणा कार्यरत ठेवली. प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त सहभागातून स्वच्छ वारीचा आदर्श निर्माण झाला.”

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “पालखी मार्गावरील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, निर्जंतुकीकरण आणि तात्पुरत्या स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले होते. अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.”

अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम म्हणाले, “लोकसहभागामुळेच अशा उपक्रमांना व्यापक यश मिळते. विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे पालखी मार्गाची स्वच्छता वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण करता आली.”

उपआयुक्त (आरोग्य) डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले, “पालखी सोहळ्यादरम्यान स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्यात आला होता. पालखी मार्गावर तैनात स्वच्छता पथके, तात्पुरत्या स्वच्छतागृहांची नियमित देखभाल, निर्जंतुकीकरण आणि त्वरित कचरा उचल यामुळे वारकरी बांधवांना स्वच्छ व आरोग्यदायी सुविधा उपलब्ध करून देता आल्या. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.”

वारीनंतर पालखी मार्ग आणि परिसराची तातडीने स्वच्छता करून शहरातील स्वच्छता व्यवस्था पूर्ववत करण्यात आली. या उपक्रमातून महापालिकेने ‘स्वच्छ वारी, सुंदर वारी’ हा संदेश प्रभावीपणे दिला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने गेल्या अनेक वर्षांपासून आषाढी वारीदरम्यान पालखी मार्गाची स्वच्छता राखणे आणि वारकरी बांधवांना आवश्यक स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची परंपरा सातत्याने जपली आहे. यंदाही त्याच परंपरेचा आदर्श कायम राखत नियोजनबद्ध, जलद आणि प्रभावी स्वच्छता मोहीम राबवून वारकरी सेवा आणि स्वच्छतेचा उत्कृष्ट समन्वय साधला

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading