मुदतपूर्व जन्मलेल्या, अतिधोकादायक स्थितीत असलेल्या बाळाला दिले नवजीवन
सह्याद्रि हॉस्पिटल्समधील डॉक्टरांची यशस्वी कामगिरी;
जीवघेण्या एनईसी, सेप्सिस आणि बुरशीजन्य संसर्गावर मात करून ३३ आठवड्यांच्या, मुदतपूर्व जन्मलेल्या बाळाचा जीव वाचविण्यात यश
पुणे : सह्याद्रि हॉस्पिटल्स मॉमस्टोरीतील डॉक्टरांनी ३३ आठवड्यांच्या, मुदतपूर्व जन्मलेल्या बाळाचे एका जीवघेण्या आजारातून प्राण वाचवले. या बाळाला ‘नेक्रोटायझिंग एन्टरोकोलायटिस हा आतड्याचा गंभीर सेप्सिस (रक्तातील संसर्ग) आणि ‘कँडिडा पॅराप्सिलोसिस‘ या बुरशीजन्य संसर्ग झाला होता, ज्यावर डॉक्टरांनी अतिशय तातडीने उपचार केले आणि त्यांच्या अथक प्रयत्नांनी ते यशस्वी झाले.
पुण्यातील एका खासगी रुग्णालयात, नऊ महिने पूर्ण होण्याआधीच जन्मलेल्या या बाळाला अत्यंत गंभीर अवस्थेत नगर रोड येथील ‘सह्याद्रि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल – मॉमस्टोरी‘ येथे आणण्यात आले होते. हे प्रकरण अत्यंत आव्हानात्मक होते, कारण एकतर बाळाचा जन्म नऊ महिने पूर्ण होण्याआधीच झालेला होता आणि त्याला गंभीर संसर्गही झालेला होता, ही आणीबाणीची स्थिती पाहता, तातडीची शस्त्रक्रिया, अतिदक्षता आणि गुंतागुंतीच्या उपचार पद्धतीची गरज होती. त्याशिवाय बाळाच्या प्रकृतीसाठी तज्ञ व्यवस्थापन, अतिशय बारकाईने निरीक्षण, जीवनावश्यक व अचूक औषधोपचार आणि एनईसी व शरीरातील संसर्ग रोखण्यासाठी अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रियांची आवश्यकता होती. सह्याद्रि हॉस्पिटल्स मॉमस्टोरी, नगर रोड येथील नवजात बालरोग आणि बालरोग विभागाचे संचालक डॉ. प्रदीप सूर्यवंशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कौशल्यामुळे या गंभीर गुंतागुंतीच्या आजारातून बाळाला सुखरूप बाहेर काढता आले. त्यांनी बाळाला वाचवण्यासाठी लागणारे वैद्यकीय उपचार आणि आवश्यक देखभाल यांचा अत्यंत नाजूक समतोल साधत हे यश संपादन केले.
एनईसी अर्थात नेक्रोटायझिंग एन्टरोकोलायटिस हा एक धोकादायक आजार असून त्यामुळे आतड्यांना गंभीर सूज येते आणि त्यांचे नुकसान होते. कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेल्या, मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांसाठी हा आजार अल्पावधीतच जीवघेणा ठरू शकतो.
बाळाची तब्येत बिघडत चाललेली होती, ती स्थिर करण्यासाठी १२ फेब्रुवारी २०२५ रोजी ज्येष्ठ बालशस्त्रक्रियातज्ञ डॉ. प्रणव जाधव यांनी आपत्कालीन ‘एक्सप्लोरेटरी लॅपरोटॉमी‘ शस्त्रक्रिया केली. या प्रक्रियेदरम्यान, आतड्याचा खराब झालेला भाग काढून टाकण्यात आला आणि ‘इलिओस्टॉमी‘ करण्यात आली. बाळाची नाजूक प्रकृती पाहता, उपचारादरम्यान घेतलेला प्रत्येक निर्णय अत्यंत निर्णायक ठरणार होता.
शस्त्रक्रियेनंतरचा काळ अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक होता. सेप्सिसशी (रक्तातील संसर्ग) लढण्यासाठी बाळाला सातत्याने व्हेंटिलेटर सपोर्ट, इनोट्रोप्स आणि उच्च क्षमतेच्या अँटीबायोटिक्सची गरज होती. संसर्ग आणि मुदतपूर्व जन्मलेल्या बाळाची नाजूक रोगप्रतिकारशक्ती या दोन्ही गोष्टी हाताळण्यासाठी नवजातबालरोगतज्ञ, बालशस्त्रक्रियातज्ञ आणि अतिदक्षता तज्ञ यांच्या दरम्यान अत्यंत अचूक समन्वयाची आवश्यकता होती.
एकदा संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर, बाळाच्या वजन वाढीचे मोठे आव्हान डॉक्टरांसमोर होते. शस्त्रक्रियेमध्ये आतड्याचा मोठा भाग काढून टाकल्यामुळे, उरलेल्या लहान आतड्याद्वारे पोषणतत्वे शोषून घेण्यास बाळाला त्रास होत होता. या समस्येवर मात करण्यासाठी विशेष फॉर्म्युला आणि ‘टोटल पॅरेंट्रल न्यूट्रिशन‘ याद्वारे बाळाची योग्य काळजी घेण्यात आली.
जेव्हा बाळाचे वजन आणि शक्ती पुरेशी वाढली, तेव्हा वैद्यकीय पथकाने नियोजित सुधारात्मक शस्त्रक्रिया केली. या दुसऱ्या शस्त्रक्रियेमध्ये ओटीपोटाच्या पोकळीची पुन्हा तपासणी करण्यासाठी आणि मागील शस्त्रक्रियेमुळे तयार झालेल्या ‘स्कार टिश्यू‘वर उपचार करण्यासाठी पुन्हा ‘एक्सप्लोरेटरी लॅपरोटॉमी‘ करण्यात आली. शेवटचा टप्पा म्हणजे ‘इलिओ–कोलिक ॲनास्टोमोसिस‘, ज्यामध्ये शौचाची प्रक्रिया नैसर्गिकरित्या सुरू होण्यासाठी आतड्याचे निरोगी भाग पुन्हा जोडण्यात आले. बाळाच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया होती.
दुसऱ्या शस्त्रक्रियेनंतर, बाळाच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होऊ लागली आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याची प्रकृती स्थिरावली. आज हे बाळ १ वर्षाचे असून, त्याची वाढ त्याच्या वयानुसार योग्य पद्धतीने होत आहे आणि त्याने विकासाचे सर्व टप्पे पूर्ण केले आहेत. हे त्याच्या सशक्त आणि सुदृढ प्रकृतीचे लक्षण आहे. दोन टप्प्यांतील शस्त्रक्रिया आणि अनेक महिने ‘नवजातबालरोग अतिदक्षता विभागा‘मधील उपचारांमुळेच या कठीण प्रकरणात यश मिळणे शक्य झाले.
सह्याद्रि हॉस्पिटल्स मॉमस्टोरी, नगर रोड येथील नवजातबालरोग तज्ञ आणि बालरोग विभागाचे संचालक डॉ. प्रदीप सूर्यवंशी यांनी सांगितले: “मुदतपूर्व जन्मलेल्या बालकामध्ये एनईसी, सेप्सिस आणि बुरशीजन्य संसर्ग असे गंभीर आजार एकाच वेळी असणे हे मोठे आव्हान होते. मात्र, वेगवेगळ्या वैद्यकक्षेत्रातील तज्ञांनी एकत्र येऊन ठरवलेला उपचार दृष्टिकोन, वेळेवर केलेले उपचार आणि नवजातबालरोग अतिदक्षता विभागात सातत्याने घेतली गेलेली काळजी यामुळे आम्ही बाळाची प्रकृती स्थिर करू शकलो. आवश्यक शस्त्रक्रियांमुळे बाळाला नवे जीवन लाभले. हे प्रकरण विशेष नवजातबालरोग देखभाल आणि प्रगत वैद्यकीय सुविधांचे महत्त्व अधोरेखित करते. अतिशय धोकादायक स्थितीत असलेल्या नवजात बाळांचे प्राण वाचवण्यासाठी आणि त्यांच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी यांची खूप आवश्यकता आहे.”
सह्याद्रि हॉस्पिटल्स मॉमस्टोरी, नगर रोड येथील बालरोग आणि नवजातबालरोग विभागाच्या ज्येष्ठ सल्लागार डॉ. प्रीती लाड म्हणाल्या: “हे प्रकरण विशेष नवजातबालरोग देखभाल आणि प्रगत वैद्यकीय सुविधांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित करते. अतिजोखमीच्या स्थितीत असलेल्या नवजात बाळांचे प्राण वाचवण्यासाठी आणि त्यांच्या दीर्घकालीन आरोग्यामध्ये सुधारणा करण्यासाठी या सुविधा खूप गरजेच्या आहेत.”
हे प्रकरण गुंतागुंतीच्या, धोकादायक संसर्गाचा सामना करणाऱ्या, मुदतपूर्व जन्मलेल्या बाळाचे होते हे तर विशेष आहेच पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, अचूक वेळी केलेले निदान, युद्धपातळीवरील शस्त्रक्रिया आणि अद्ययावत नवजातबालरोग विभागातील तज्ञ डॉक्टरांची अखंड सेवा यामुळे अशक्य गोष्टीही शक्य होऊ शकतात, याचेही ते एक उत्तम उदाहरण आहे.
