… ही बनली आहे सत्ताधाऱ्यांची परंपरा
विमान अपघात प्रकरणी सखोल चौकशीची नाना पटोले यांची मागणी
मुंबई : मोठ्या अपराधात अडकलेल्यांना परदेशात पळून जाण्याची संधी देणे ही सत्ताधाऱ्यांची परंपराच बनली असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला. अजित पवार यांच्या निधनाला कारणीभूत ठरलेल्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी देखील पटोले यांनी केली.
मोठमोठ्या गुन्ह्यात अडकलेल्या लोकांना खुद्द सत्ताधाऱ्यांकडून परदेशात पळून जाण्याची संधी दिली जाते. अजित पवार यांचा विमान अपघात झाला त्या विमान कंपनीचा मालक रोहित सिंग हा अपघातानंतर लगेच परदेशात पळून गेला आहे. त्याला भारतात आणून त्याची काटेकोरपणे चौकशी करणे गरजेचे आहे, असे मत पटोले यांनी व्यक्त केले.
अजित पवार यांच्या विमान अपघातामागे घातपात असू शकतो, अशी शंका व्यक्त करताना नाना पटोले यांनी, ऐनवेळी वैमानिक का बदलण्यात आला, कोणाच्या सांगण्यावरून हा बदल करण्यात आला, पाठवण्यात आलेल्या वैमानिकाची पार्श्वभूमी काय होती, या सर्व बाबींची सखोल चौकशी झाल्याशिवाय या अपघाता मागील सत्य उघड होणार नाही, असे सांगितले.
अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली आहे. मात्र, केंद्रीय तपास यंत्रणांवर आता कोणाचाही विश्वास राहिलेला नाही. गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या विमान अपघाताचे सत्य अद्यापही समोर आलेले नाही. गोव्याच्या क्लब मध्ये स्फोट झाल्यानंतर त्याचा मालक प्रदेशात पळून गेला. त्याची कोणतीही चौकशी झालेली नाही, असा आरोप पटोले यांनी केला.
केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून पवार कुटुंबामध्ये जाणीवपूर्वक फूट पाडली जात असल्याचा आरोप पटोले यांनी केला. पवार कुटुंब एकत्र राहावे, अशी आमची आणि काँग्रेसची इच्छा आहे. कुटुंब एकत्र असावे हीच संस्कृती आहे. मात्र, राजकीय स्वार्थासाठी त्यांच्या दुपारी निर्माण केली जात आहे, असे ते म्हणाले.
सरकारचा द्वेषपूर्ण कारभार
कोणत्याही घटनात्मक पदाचा स्वीकार करतात होण्याबद्दल ममत्व अथवा द्वेष बाळगणार नसल्याची शपथ घेतली जाते. मात्र, सध्याच्या सरकारचा कारभार द्वेष भावनेतून सुरू आहे. मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरून ते स्पष्टपणे दिसून येते, असा आरोपही पटोले यांनी केला.
