‘अजित पवार यांचे कार्य व विचार अधिक निष्ठेने…’ सुनेत्रा पवार यांची विमान अपघातानंतर पहिलीच पोस्ट
पुणे : जिल्हा परिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणाऱ्या जागरूक मतदारांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आभार मानले आहेत. त्याचप्रमाणे अजित पवार यांचे कार्य व विचार निष्ठेने व कार्यक्षमतेने पुढे नेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी धन्यवाद दिले आहेत.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांची समाज माध्यमातून पहिलीच पोस्ट प्रसिद्ध झाली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 या लोकशाहीच्या उत्सवात उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग नोंदवत आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही अधिक मजबूत केल्याबद्दल सर्व मतदार बंधू-भगिनींचे मनःपूर्वक आभार…, असे सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान राष्ट्रवादी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना, आपले लाडके नेते, राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीतील ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रगतीच्या संकल्पपूर्तीसाठी शिस्तबद्ध, एकजुटीने आणि निष्ठेने पक्षासाठी कार्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व मान्यवर नेते, आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक यांचे विशेष आभार. आपल्या समर्पणामुळे, अथक परिश्रमांमुळे आणि संघटित प्रयत्नांमुळेच पक्षाचे तसेच आदरणीय अजितदादांचे विचार व कार्य अधिक सक्षम आणि परिणामकारकपणे पुढे जात आहे. मनःपूर्वक धन्यवाद , असेही सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.
