राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण निश्चित?
जिल्हा परिषद निवडणुकीनंतर होणार घोषणा
मुंबई प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांचे विलीनीकरण करण्याबाबत निर्णय झाला असून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक पार पडल्यानंतर त्याबाबतची अधिकृत घोषणा होणार असल्याचे दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे.
तब्बल सहा महिन्यापूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू होती. खुद्द दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. त्याबाबत अजित पवार यांची खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी अनेकदा चर्चा झाली होती. अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही नेते पत्रकार परिषद घेऊन विलीनीकरणाबाबत घोषणा करणार होते, असे सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री राजेश टोपे आणि एकनाथ खडसे यांनी देखील दोन्ही गटांचे विलीनीकरण होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकसंध होणार असल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून सर्वोच्च नेत्यांपर्यंत सर्वांची तीच इच्छा असल्याचा त्यांचा दावा आहे.
