Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

एमआयटी एडीटी आणि ॲडमिशन सजेशन आयोजित करिअर गायडन्स सेमिनार संपन्न

पिंपरी चिंचवड : एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणे आणि ॲडमिशन सजेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बारावी नंतर पुढे काय?’ या विषयावर मोफत करिअर गायडन्स सेमिनार आयोजित करण्यात आला होता. या सेमिनारला विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा तसेच पालकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. तसेच या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील तज्ञ शिक्षकांना ‘गुरु गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

या सेमिनार मध्ये विद्यार्थ्यांना एमआयटी एडीटी विद्यापीठाचे विद्यार्थी कार्य चे सहाय्यक संचालक डॉ. उल्हास माळवदे व सहाय्यक प्राध्यापक डॉ. नंदकिशोर कार्लेकर आणि ॲडमिशन सजेशनचे संचालक अक्षय कुमार भंडारी यांचे मार्गदर्शन लाभले. बारावी नंतर पुढे काय? या विषयावर मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम मंगळवार दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी येथे संपन्न झाला. यावेळी विविध कोचिंग क्लासेसचे उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी डॉ. उल्हास माळवदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बारावी नंतर पुढे काय? याबद्दल माहिती देत बारावी नंतर विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध असल्याचे सांगत विविध अभ्यासक्रमाबद्दल माहिती दिली. तसेच एमआयटी एडीटी विद्यापीठात ऍडमिशनसाठी असलेले निकष यावेळी समजून सांगितले. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करियर करून नावलौकिक मिळवावे. तुम्ही वेळेचे नियोजन करून अभ्यास करा, यामुळे चांगले गुण मिळवण्यास मदत होईल. त्याचप्रमाणात अभ्यास करताना रिव्हिजन सुरु ठेवा. काही विद्यार्थी परीक्षेच्या एक दिवस अगोदर रिव्हिजन करतात, मात्र तुम्ही पाहा, जे टॉपर विद्यार्थी आहेत, त्यांची अभ्यास करण्याची पद्धत आणि आपली पद्धत कशी आहे. तसेच विद्यार्थ्यांनी बारावी नंतर कोणते अभ्यासक्रम निवडावे? कोणते महाविद्यालय निवडावे? या बद्दल माहिती देत प्रवेश परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना माळवडे यांनी काही सोप्या पद्धतीने स्टेप नुसार विद्यार्थ्यांना समजून सांगितले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरे करीत आप-आपली समस्या मांडली, या समस्येचे निवारण उल्हास माळवदे यांनी केले.

यावेळी बोलताना डॉ. नंदकिशोर कार्लेकर म्हणाले, “तुम्ही तुमच्या करिअरचा मार्ग ठरवत असताना काही गोष्टी लक्षात ठेवा, मशीन कसे शिकतात, डेटा निर्णय कसा बदलतो किंवा मोबाइल अॅप्स लोकांचे जीवन कसे सुलभ करतात, या गोष्टींची आवड असेल तर तीच दिशा निवडा. स्पेशलायझेशन करा म्हणजे तुमच्या आवडीला दिशा द्या, ज्यात तुमची आवड असेल, तीच दिशा निवडा, याने तुमच्या करियरला योग्य वळण मिळेल. प्रगत तंत्रज्ञान शिकण्यापूर्वी गणित, भौतिकशास्त्र आणि कोअर प्रोग्रॅमिंग या विषयांमध्ये तुमचा पाया मजबूत असावा. फक्त आजची नोकरी नव्हे, तर दीर्घकालीन दृष्टी ठेवा: आज जे तंत्रज्ञान शिकत आहात (AI, Edge Computing, Blockchain) ते पुढील दशकात जगाच्या मूलभूत प्रणालीचा भाग होणार आहे. म्हणून तुमचा करिअर फक्त 2025 साठी नव्हे, तर भविष्यासाठी घडवा. सतत शिकत राहा: तंत्रज्ञान सतत बदलत असते. पहिल्या वर्षी शिकलेले तिसऱ्या वर्षी बदलू शकते. त्यामुळे सतत शिकण्याची वृत्ती ठेवा. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमासोबत संशोधन सुविधा, उद्योग सहकार्य, मार्गदर्शन व प्लेसमेंट सहाय्य या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत आणि एमआयटी एडीटी या बाबतीत सक्षम असल्याचे म्हंटले आहे.

पुढे मार्गदर्शन करताना अक्षयकुमार भंडारी यांनी सीईटी आणि जेईई अभ्यासक्रमाबद्दल माहिती संपूर्ण प्रवेशप्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. सीईटी आणि जेईई अभ्यासक्रम अंतर्गत कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आणि ते कसे निवडायचे? याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी इंजिनीरिंग अभ्यासक्रम संदर्भात प्रवेश प्रक्रियेची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच जेईई अभ्यासक्रमात कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या असल्याचे सांगितले.

शहरातील शिक्षकांचा ‘गुरु गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान

याप्रसंगी पिंपरी चिंचवड शहरातील तज्ञ शिक्षकांचा ‘गुरु गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये चिंचवड येथील चाटे कोचिंग क्लासचे संचालक प्रा. विजय बोबडे सर, ओम फिनिक्स कोचिंग क्लासेसच्या संचालिका फुंदे मॅडम, निगडी-रावेत येथील चाटे कोचिंग क्लासचे संचालक सावंत डीजे, ओमकार मॅथ अकॅडमी संचालक वाळुंज सर, थेरगाव येथील चाटे कोचिंग क्लासेस चे प्राध्यापक सचिन निंजवते, साने चौक येथील ओम फिनिक्स कोचिंग क्लासेस चे घोंगडे सर तसेच निगडी येथील ओम फिनिक्स कोचिंग क्लासचे नितेश शिरसाठ यांचा गुरु गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी आप-आपले मनोगत व्यक्त केले.

यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्याला येणाऱ्या अभ्यासाविषयी समस्या संदर्भात मान्यवरांना प्रश्न उत्तरे करत आपापल्या समस्याचे निराकरण करून घेतले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरिता ॲडमिशन सजेशनचे आकाश भंडारी, संदेश भंडारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमराज नाडे यांनी केले तर आभार अक्षय भंडारी यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading