Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

‘स्वरयात्री‌’तून उलगडला श्रीनिवास खळे, माणिक वर्मा यांचा सुवर्णकाळ

 

पुणे : संगीत रचनेतील वैविध्य जपणाऱ्या तसेच गुणगुणायला आणि गायलाही अवघड परंतु मनाचा ठाव घेणाऱ्या अनवट चाली असे वैशिष्ट्य असणाऱ्या ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या प्रसिद्ध रचना तसेच मराठी भावसंगीत क्षेत्रात भावपूर्ण गायनासाठी ओळखल्या जाणाऱ्या माणिक वर्मा यांनी गाऊन अजरामर केलेल्या गीतांचा नजराणा रसिकांना आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी अनुभवायला मिळाला.

निमित्त होते दिवाळी सणाचे औचित्य साधून ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे व ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्याच गीतांवर आधारित ‌‘स्वरयात्री‌’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे! स्वरानंद प्रतिष्ठानची निर्मिती असलेला हा कार्यक्रम सोमवारी (दि. 20) यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची संकल्पना संवाद, पुणेचे सुनील महाजन यांची होती तर कार्यक्रमाचे सूत्रधार प्रा. प्रकाश भोंडे होते. निकिता मोघे, केतकी महाजन-बोरकर यांचे संयोजन होते.

स्वरानंद प्रतिष्ठानला 55 वर्षे झाल्यानिमित्त प्रा. प्रकाश भोंडे यांचा या प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगशे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. लोकमान्य मल्टिपर्पज संस्थेचे वरिष्ठ व्यवस्थापक सचिन होडगे मंचावर होते.

‌‘जय जय राम कृष्ण हरी‌’च्या गजरानंतर कार्यक्रमाची सुरुवात ‌‘सुंदर ते ध्यान‌’ या संत तुकोबाराय यांच्या भक्तीरचनेने झाली. ‌‘लाजून हासणे‌’, ‌‘श्रावणात घननिळा‌’, ‌‘जेव्हा तुझ्या बटांना‌’, ‌‘एका तळ्यात होती‌’, ‌‘काळ देहासी‌’, ‌‘राजस सुकुमार‌’, ‘शुक्रतारा मंदवारा’ अशा श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेल्या रचना तर ‌‘उघड नयन देवा‌’, ‌‘सावळाच रंग तुझा‌’, ‌‘क्षणभर उघड नयन‌’, ‌‘पाण्यातले पहाता‌’, ‌‘हसले मनी चांदणे‌’ आदी माणिक वर्मा यांच्या सुप्रसिद्ध रचनांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.

सुप्रसिद्ध पार्श्वगायिका मधुरा दातार, स्वरदा गोडबोले तसेच सुप्रसिद्ध पार्श्वगायक जितेंद्र अभ्यंकर यांनी सुमधूर आवाजात गीते सादर केली. संगीत संयोजन पराग माटेगावकर यांचे होते तर कलाकारांना केदार परांजपे, अमृता ठाकूरदेसाई, निलेश देशपांडे, अभिजित भदे, डॉ. राजेंद्र दूरकर, केदार मोरे यांनी समर्पक साथसंगत केली.

प्रास्ताविकात सुनील महाजन यांनी संवाद, पुणेच्या वाटचालीचा आढावा घेत संगीत व सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने 55 वर्षे कार्यक्रम घेणाऱ्या स्वरानंद संस्थेचा पुणेकरांमार्फत सन्मान व्हावा या करिता प्रा. प्रकाश भोंडे यांचा सत्कार करत आहोत.

-==-
संगीतविषयक प्रेमापोटी केलेले प्रा. प्रकाश भोंडे यांचे कार्य गौरवास्पद आहे. रसिकांच्या सहभागातूनच स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे आयोजित अनेक कार्यक्रमांना उत्तम यश मिळाले आणि त्यातूनच अनेक कलाकार घडले. त्यांनी 55 वर्षे संस्था सांभाळून कार्यरत ठेवली आहे, याचे कौतुक आहे.

  • डॉ. मोहन आगाशे
    -==-
    स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे 1970 सालापासून अविरतपणे संगीत, सांस्कृतिक क्षेत्रात हजारो कार्यक्रम घेण्यात आले आहेत. यात अनेक गौरव सोहळे तसेच संगीताचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यातूनच नवनवीन कलाकार भेटत गेले आणि जवळपास हजार कलाकार, गायक, वादक, निवेदक, तंत्रज्ञ यांना स्वरमंच उपलब्ध करून देण्यात आला. एका संयोजकाने दुसऱ्या यशस्वी संयोजकाचा सन्मान करणे हे विशेष आनंददायक आहे.
  • प्रा. प्रकाश भोंडे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading