Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

मोठ्या व्यावसायिकांनी छोट्या उद्योजकांना मार्गदर्शन करण्याची गरज – डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

पुणे : आज अनेक छोटे उद्योजक स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी सरकारच्या विविध योजना, जसे की मुद्रा योजना यांचा लाभ घेत आहेत. अशा उद्योजकांच्या प्रगतीसाठी स्थापित व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन मदत करणे आवश्यक आहे. सध्या देशातील अनुत्पादक मालमत्ता (नॉन-परफॉर्मिंग ॲसेट) चे प्रमाण कमी आहे, मात्र ते आणखी घटविण्यासाठी मोठ्या व्यावसायिकांनी मुद्रा उद्योजकांना ‘दत्तक’ घेऊन त्यांना मार्गदर्शन केले, तर उद्योगजगताची संस्कृती देशात अधिक बळकट होईल आणि नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणाऱ्यांची संख्या वाढेल, असे मत माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केले.

शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचा उपक्रम असलेल्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) च्या १८ व्या वर्धापनदिनानिमित्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन टिळक स्मारक मंदिर येथे करण्यात आले. यावेळी सृजन आर्ट गॅलरी पुरस्कृत सृजन युवा कलाकार पुरस्कार अभिनेत्री मुक्त बर्वे यांना व स्व. चंद्रकांत जोशी स्मृतिप्रित्यर्थ युवा उद्योजक पुरस्कार उद्योजक प्रसाद कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाला खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, चारुहास पंडित, विश्राम कुलकर्णी, श्रीकांत जोशी, उपेंद्र केळकर, सचिन पंडित, मंजुषा वैद्य,प्रतिभा संगमनेरकर, हर्षल लेले अजय कुलकर्णी आशिष कुलकर्णी, मंदार महाजन अंजली दारव्हेकर, मिलिंद दारव्हेकर, स्वाती कुलकर्णी अभिजित देशपांडे, प्रशांत देशपांडे, कार्तिकी जोशी उपस्थित होते. सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. उद्योजक मकरंद विपट यांचा विशेष सन्मानीय सत्कार देखील करण्यात आला.

खासदार डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, एखाद्या विशिष्ट समाजाची ऊर्जा समाजातील व्यक्तीला मदत करण्याची असू शकते. मग आपला समाज स्वतःला व्यक्त करण्यासाठी मागे का रहावा? आपण सर्वांनी एकत्र येऊन केवळ आपल्या समाजालाच नव्हे, तर इतरांनाही मदत केली पाहिजे. मात्र त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. एकत्र येऊन आघातग्रस्त समाजबंधूंसाठी मदतीचा हात पुढे करूया, असेही त्यांनी सांगितले.

पुरस्काराला उत्तर देताना मुक्ता बर्वे म्हणाल्या, कलाक्षेत्रात काम करताना इतर क्षेत्रातील व्यक्तींना पाहिल्यानंतर जाणवते की समाजात करण्यासारखे खूप काही आहे. त्यांच्या कार्याकडे पाहून सतत ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असते. प्रसाद कुलकर्णी म्हणाले, व्यक्तीला मार्ग दिसतो, पण त्या मार्गावर पुढे जाण्यासाठी आपल्या माणसांची साथ आवश्यक असते. मला माझ्या कुटुंबाकडून मिळालेली साथ हेच माझ्या यशाचे खरे कारण आहे, असेही त्यांनी सांगितले. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर दोन्ही पुरस्कारार्थी यांची मुलाखत केतन गाडगीळ यांनी घेतली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading