‘अमृत वर्षा’ या सांगीतिक कार्यक्रमाद्वारे रसिकांना मिळणार रात्रीचे व उत्तर रात्रीचे राग ऐकण्याची संधी
येत्या ४ ऑक्टोबर रोजी भरत नाट्य मंदिर येथे सायं ६ ते पहाटे ६ दरम्यान कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : भारतीय शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम हे बरेचदा दिवसा होत असतात. त्यामुळे रात्रीचे व उत्तर रात्रीचे राग ऐकण्याची संधी रसिकांना सहसा मिळत नाही. हेच लक्षात घेत आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनच्या वतीने येत्या शनिवार दि. ४ ऑक्टोबर रोजी सायं ६ ते पहाटे ६ या वेळेत ‘अमृत वर्षा’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिर येथे संपन्न होणार असून तो सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश उपलब्ध होईल. कार्यक्रमावेळी काही जागा या निमंत्रितांसाठी राखीव असतील याची कृपया नोंद घ्यावी.
या अनोख्या कार्यक्रमात अनेक उदयोन्मुख तरुण गायक आणि वादक कलाकार आपली कला उपस्थितांसमोर सादर करतील. यामध्ये प्रसिद्ध गायक नागेश आडगांवकर, सुप्रसिद्ध गायिका रागेश्री वैरागकर, मीनल दातार, आदित्य मोडक, धनश्री घैसास, केदार केळकर, अंकिता जोशी, मेहेर परळीकर, आदित्य खांडवे आपली गायन सेवा सादर करतील तर पं. संगीत मिश्रा हे सारंगी आणि अनुप कुलथे हे व्हायोलिनवादन सादर करणार आहेत. कार्यक्रमादरम्यान रामकृष्ण करंबेळकर, अभिजीत बारटक्के, ऋषिकेश जगताप तबलासाथ करतील. हर्षल काटदरे, सुधान्शु घारपुरे व निलय साळवी हे संवादिनी साथ करतील. अमृत वर्षा या कार्यक्रमाचा शेवट डॉ. पौर्णिमा धुमाळे यांच्या सुमधुर गायनाने होईल.
आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशन ही संस्था प्रामुख्याने पर्यावरण संवर्धन, विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात गेल्या ११ वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहे. आपल्या सांगीतिक क्षेत्रातील कामासाठी संस्थेच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात येत असून या अंतर्गत भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार, प्रसार करण्यासोबतच नव्या पिढीपर्यंत आपल्या संगीताचा समृद्ध वारसा पोहोचावा यासाठी प्रयत्न करण्यात येत असतात. गेल्या काही वर्षांत संस्थेच्या वतीने अनेक यशस्वी अशा सांगीतिक मैफलींचे आयोजनदेखील करण्यात आले आहे.
