मान्सूनचा जोर ओसरला तरीही पावसाचा जोर कायम राहणार
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचा राज्यातील पर्जन्यमानावर परिणाम
पुणे: प्रतिनिधी
राज्यात मान्सूनचा जोर ओसरत असला तरी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात पावसाचा जोर ३१ तारखेपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मराठवाड्याच्या जिल्ह्यात ३० ते ४० किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडेल. या परिसराला हवामान शास्त्र विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील घाटमाथ्यावर विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल. तसेच आभाळात काळ्या मेघांची दाटी झाल्यामुळे या काळात दृश्यमानताही कमी असेल. त्यामुळे प्रवाशांनी काळजी घ्यावी, अशी सूचनाही हवामानशास्त्र विभागाने केली आहे.
रायगड, रत्नागिरी, पालघरसह गोव्याच्या सीमेपर्यंत कोकणातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि ठाण्यात मात्र, तुलनेने पावसाचे प्रमाण कमी राहील, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
