विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्याला दोघेजण भेटले होते. त्यांनी मतदानात फेरफार करून १६० जागा मिळवून देण्याची खात्री दिली होती.
नागपूर: प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्याला दोघेजण भेटले होते. त्यांनी मतदानात फेरफार करून १६० जागा मिळवून देण्याची खात्री दिली होती. त्यांची राहुल गांधी यांच्याशी भेटही करून दिली. मात्र, आम्ही दोघांनी त्या मार्गाने न जाता जनतेचा कौल घेण्याचा निर्णय घेतला, असा अजब दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
विधानसभा निवडणूक होण्यापूर्वी दोन जण आपल्याकडे आले होते. त्यांनी मतांमध्ये फेरफर करून महाविकास आघाडीला १६० जागा मिळवून देऊन विजयी करून देऊ, अशी खात्री दिली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी त्यांची भेट करून दिली, असे पवार यांनी सांगितले.
मात्र, आमचा दोघांचाही निवडणूक आयोगावर विश्वास होता. त्यामुळे या मार्गाने न जाण्याचे ठरवले. हे होऊ शकत नाही, असे त्या दोघांना सांगितले. त्या दोघांचे नाव, पत्ते आता आपल्याकडे नाहीत, असे पवार म्हणाले. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पवार यांच्या या दाव्याला दुजोरा दिला आहे.
… तर तुम्ही हे केले असते का?
हे दावे अत्यंत बालिश आणि हास्यास्द आहेत. शरद पवार यांच्यासारखे ज्येष्ठ नेत्यांनी असे बाळबोध जावे करणे त्यांना शोभत नाही. जिंकून देण्याचा दावा करणाऱ्या दोघांना तुम्ही राहुल गांधी यांची भेट घालून दिली. म्हणजे तुम्हाला मतदानात फेरफार करून जिंकायचे होते का? राहुल गांधी यांनी संमती दिली असती तर तुम्ही या मार्गाने गेला असता का, असे सवाल करताना भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी, हा ‘बैल गेला आणि झोपा केला, ‘ अशातला प्रकार असल्याचे सांगत पवार यांची खिल्ली उडवली.
