Monday, May 25, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मुंडे यांचा पुन्हा मंत्रिमंडळ मध्ये समावेश केला तर तुमचा राष्ट्रवादी नावालाही शिल्लक राहणार नाही – मनोज जरांगे पाटील

बीड: प्रतिनिधी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येनंतर राजीनामा देणे भाग पडलेले मंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याच्या शक्यतेच्या चर्चा होत असतानाच, मुंडे यांचा समावेश पुन्हा करण्यात आला तर तुमचा पक्ष नावालाही शिल्लक राहणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला आहे.

एकीकडे केवळ धनंजय मुंडे यांचेच नव्हे तर मुंडे घराण्याचे दहशतीचे राजकारण संपुष्टात आल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नुकताच केला आहे तर दुसरीकडे लवकरच मुंडे यांना पुन्हा मंत्री केले जाणार, या चर्चेने वेग घेतला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, मुंडे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार गटातील व बीड जिल्ह्यातील वजन, इतर मागास वर्गातील मतदारांवर प्रभाव, या सर्व दृष्टिकोनातून मुंडे यांचे मंत्रीपदावर पुनर्वसन केले जाईल, असे पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. कृषी घोटाळ्यात त्यांना क्लीन चिट मिळाली आहे. आता देशमुख हत्या प्रकरणाचा धुरळा बसत असल्याचे पाहून त्यांना पुन्हा मंत्रीपद देण्यात येईल, असे सांगितले जात आहे.

मात्र, मनोज जिरंगे यांच्यासह अनेकांनी हा निर्णय आत्मघातकी ठरेल, असा इशारा दिला आहे. मुंडे यांना पुन्हा मंत्रीपद बहाल करणे हेच स्वप्नात देखील बघू नका. नाही तर तुमचा अख्खा पक्ष संपून जाईल, असे जरांगे पाटील म्हणाले आहेत तर, धनंजय मुंडे हे मंत्रिपद देण्याच्या पात्रतेचे नाहीत, असे मत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी व्यक्त केले आहे. मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदी वर्णी लागलेले छगन भुजबळ यांनी, ते आले तर चांगलेच आहे,अशी मोजकी प्रतिक्रिया दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading