Wednesday, June 24, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

केवळ पैसे मिळवण्यासाठी दुबे महाराष्ट्रात आले – खासदार संजय राऊत

मुंबई: प्रतिनिधी

खासदार निशिकांत दुबे यांच्या राज्यात नोकरी, धंदे नसल्यामुळे केवळ पैसे मिळवण्यासाठी दुबे महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या 106 हुतात्म्यांमध्ये एकही दुबे, चौबे नाहीत, असा टोला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

मतांच्या प्रमाणाची आकडेवारी पुढे करून आगामी महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे यांचे राजकारण संपुष्टात येईल, असे विधान भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाला राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.

निशिकांत दुबे यांना अवास्तव महत्त्व दिले जात आहे. ते मराठीच्या विरोधात बोलतात. हा मराठी भाषेचा आणि माणसांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावर काही बोलत नाहीत. त्यांच्यासारखे लोक पैसे कमवायला मुंबईत येतात. मराठी माणसाचे पोट मारून महाराष्ट्र लुटला जात आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

मुंबईतील मतांच्या टक्केवारीचा आधार घेऊन दुबे यांनी महापालिकेच्या निकालाचे भाकीत वर्तवले आहे. मुंबईमध्ये केवळ 30 टक्के लोक मराठी बोलतात तर 30 टक्के लोक हिंदी बोलतात. अडीच टक्के लोक राजस्थानी बोलतात. उर्वरित सर्व मतदार अमराठी आहेत. त्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांचे भाषेवर आधारित राजकारण संपुष्टात येईल, असे विधान निशिकांत दुबे यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading