Saturday, May 30, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सूर्यवंशी, वाकोडे मृत्यू प्रकरणी मंत्रालय घेरावा : हजारो भीमसैनिकांना पोलिसांनी रोखले.

मुंबई : स्व. सोमनाथ सुर्यवंशी व लोकनेते विजय वाकोडेंना न्याय मिळेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, आज सरकारने आम्हाला अडवले पण आम्ही रान पेटवूच, असा इशारा डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी सरकारला दिला. स्व. सोमनाथ सूर्यवंशी व लोकनेते विजय वाकोडे यांना न्याय मिळावा यासाठी आज सोमवार 3 मार्च रोजी मुंबई येथे आंबेडकरी संघटना सर्व पक्ष संविधान प्रेमी नागरिकांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनात महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने भीमसैनिकांनी सहभाग घेतला. यावेळी मंत्रालयाला घेराव घालण्यासाठी निघालेल्या हजारो भीमसैनिकांना पोलिसांनी काही तास अडवले. बराच वेळ आंदोलक आणि पोलिसांत संघर्ष झाला. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांना बोलवून घेत मागण्या मान्य करण्याबाबत त्या विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक लावुन मागण्या मान्य केल्या जातील हे आश्‍वासन दिले तेंव्हा हे आंदोलन मागे घेण्यात आले.

सकाळपासूनच मुंबईच्या आझाद मैदानावर निळे ध्वज, पंचशील ध्वज घेऊन तसेच हातामध्ये फलक घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, असा जोरदार घोषणा देत भीमसैनिक आझाद मैदानात दाखल झाले. यावेळी या आंदोलनाचे समन्वयक डॉ सिद्धार्थ हत्तीआंबिरे यांच्यासह मंचावर भिक्खू संघ यांची उपस्थिती होती. यावेळी या आंदोलनाला विशेष उपस्थिती म्हणून मुंबई काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड, माजी विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार, परभणी विधानसभेचे आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार सिद्धार्थ खरात मेहकर, पीआरपीचे राज्य सचिव गौतम मुंडे, त्यांच्यासह विविध पक्ष संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांनी हजेरी लावत सरकारला याबाबत जाब विचारणार असल्याचे आंदोलकांना सांगितले. आंदोलक विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍या पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, सूर्यवंशी व वाकोडे परिवार यांना एक कोटीची मदत करून त्यांचे पुनर्वसन करावे आणि या आंदोलनादरम्यान कॉम्बिन ऑपरेशन करून निरपराध भीमसैनिकांवरील गुन्हे दाखल केलेले आहेत ते मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर आंदोलन मागे…
दुपारी 3 वाजता मान्यवरांच्या भाषणानंतर हजारो भीमसैनिकांनी मंत्रालयाला घेराव घालण्यासाठी मोर्चा नेला असता आझाद मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच हा मोर्चा पोलिसांकडून अडवण्यात आला. यावेळी पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये बराच वेळ संघर्ष पाहायला मिळाला, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे व पोलिसांवर कारवाई केलीच पाहिजे, सरकारचा जाहीर निषेध अशा घोषणाही आंदोलन कर्त्याच्या वतीने करण्यात येत होत्या. हा संघर्ष सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांच्या एका शिष्टमंडळाने मंत्रालयात बोलवून घेत मागण्यांचे निवेदन स्वीकारले, तसेच काही मागण्या मान्य केल्या. उर्वरीत मागण्या मान्य करण्याबाबत त्या विभागांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक बोलावून त्यामध्ये या मागण्या मान्य केल्या जातील, असे आश्‍वासन दिल्या नंतरच हे आंदोलन थांबवण्यात आले. या राज्यव्यापी आंदोलनास परभणीसह राज्यातून आंबेडकरी संघटना संविधान प्रेमी नागरिक यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading