विजय वरुडकर यांना गो ग्राम युवा पुरस्कार प्रदान
पुणे : आत्मनिर्भर गो ग्राम अभियानात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुण्याचे विजय वरुडकर यांना भारत विकास संगम च्या वतीने आयोजित भारतीय संस्कृती उत्सवात गो ग्राम युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ विचारवंत आणि प्रकृती केंद्रीत विकासाचा महामार्ग सांगणारे के. एन. गोविंदाचार्य यांच्या हस्ते सेडम जिल्हा कलबुर्गी कर्नाटक येथे त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
भारत विकास संगम आयोजित ७ वा संस्कृती संगम मध्ये राष्ट्रीय पातळीवरील विचार मंचातर्फे समाजातील सक्रिय सकारात्मक कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना सन्मानित करण्यात येते. सन २०१८ साली वरुडकर यांनी हे आय टी क्षेत्रातील नोकरी सोडून ग्राम विकास व सामाजिक संस्था सक्षमीकरण विषयासाठी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, राष्ट्रीय कर्तव्य अभियान समूहा तर्फे देश भरातील तब्बल ३५०० पेक्षा अधिक सामाजिक कार्यकर्ते, ५०० वारकरी कीर्तनकार, ३०० पेक्षा अधिक गोशाळा समूह यांचा जनसंपर्क तयार केला आहे
राज्यात गोसेवा आयोग स्थापना व्हावी, यासाठी ३० हजार किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला होता. आत्मनिर्भर भारत तेंव्हा घडेल जेंव्हा भारतातील गावे, गावातील शेतकरी शेती आत्मनिर्भर होईल. या विषयी गेली १० वर्ष ते सातत्य पूर्वक प्रयत्न करीत आहेत. मागील वर्षी त्यांच्या प्रयत्नातून देशातील पहिला आत्मनिर्भर ग्राम शासकीय आदेश राज्य सरकारने काढला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ग्राम विकास गतिविधीत गोसंपदा विषयी उपक्रमात पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंडळ सदस्य म्हणून विजय वरुडकर कार्यरत आहेत. देशी गोवंश आधारित ग्राम विकास, गाय आधारित नैसर्गिक शेती उत्पादने निर्मिती, शेतकरी उत्पादक गट यांचे प्रशिक्षण, बचत गटांची कौशल्य विकास, उत्पादने निर्मिती व विक्री यावर त्यांनी काम केले आहे.
आज पर्यंत त्यांना राजीव दीक्षित कुशल संघटन पुरस्कार, परभणी प्रतिष्ठान तर्फे परभणी रत्न पुरस्कार, अजिंक्य बहुउद्देशीय संस्थेतर्फे राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार यासोबतच विश्व हिंदू परिषदे तर्फे त्यांना गोसंवर्धन कार्यासाठी सन्मानित करण्यात आले आहे.
