शिक्षकांवरील कामाचा ताण कमी करावा तरच पिढी घडेल- खा. संजय दिना पाटील
मुंबई : शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याची गरज असून ते नवीन पिढीला घडविण्याचे काम करतात. त्यांच्यावरील कामाचा ताण कमी होणे गरजेचे आहे. जेणेकरून शिक्षक मुलांना शिकवण्याचे काम चांगल्या प्रकारे करू शकतील . असे वक्तव्य ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन मुलुंड या ठिकाणी भरविण्यात आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मुलुंड येथील आर आर एज्युकेशन ट्रस्टच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन आज पार पडले. या अधिवेशनाला राज्यभरातून शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते विनायक राऊत, अनिल देसाई, युवासेना कार्यकारणी सदस्य राजोल संजय पाटील हे या अधिवेशनाला उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा चांगला समाचार घेतला. त्यांच्यावर बोचरी टीका करीत राज्यातील अनेक चांगल्या योजना बंद केल्या जातं असून पाच लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. आता शिवभोजन थाळी बंद करण्याची तयारी चालली असल्याचे त्यांनी सांगितले. तर शिक्षक हे मुलांवर संस्कार करण्याबरोबरच नवीन पिढी घडविण्याचे काम करतात. सध्या शिक्षकांवर निवडणुकीच्या व्यतिरिक्त इतरही कामे दिली जातात. त्यामुळे मुलांकडे त्यांना जास्त वेळ देता येत नाही. शिक्षकांनी केवळ शिक्षण देण्याचे काम करावे. त्यांच्यावरील कामाचा ताण कमी करणे गरजेचे असल्याचे वक्तव्य ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी केले.
