Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

तरूणांच्या संकल्पना जाणून घेणारे ‘भाजयुमो’ चे अनोखे अभियान


भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील यांची माहिती

मुंबई : मोदी सरकार विकसित भारत 2047 या ध्येयाकडे वाटचाल करत असताना तरुणांच्या कल्पना , आकांक्षा जाणून घेण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे राज्यातील तरुणांशी थेट संपर्क साधण्याचे अनोखे अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी पुढील 25 दिवसात जिल्हा स्तरावर 50 हजारांहून अधिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस व युवा मोर्चाचे प्रभारी आ. विक्रांत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली. भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, भाजयुमोचे महामंत्री योगेश मैंद, बादल कुलकर्णी, निखिल चौहान उपस्थित होते.
विकसित भारत 2047 चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत आयडियाज फॉर विकसित महाराष्ट्र या अभियानाचा प्रारंभ केला. या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट राज्यातील तरुणांच्या सूचना एकत्रित करणे आणि विकसित महाराष्ट्रासाठी त्यांच्या कल्पना आणि दृष्टीकोन संकलित करणे हे आहे. आयडियाज फॉर विकसित महाराष्ट्र अभियानातून मिळालेल्या कल्पना आणि सूचनांमुळे विकसित भारत 2047 च्या राष्ट्रीय उद्दिष्टाच्या अनुषंगाने विकसित महाराष्ट्राचा पाया तयार होईल. हे अभियान युवकांच्या विकासासाठी भाजपाची दीर्घकालीन बांधिलकी दर्शवते. उज्ज्वल भविष्यासाठी, युवा सक्षमीकरण, सशक्त, शाश्वत आणि यशस्वी महाराष्ट्र घडवण्यासाठी तरुणांच्या कल्पना, दूरदृष्टी आणि सूचना यांची अंमलबजावणी करणे महत्वाचे आहे, असे आ. विक्रांत पाटील यांनी सांगितले.
या मोहिमेद्वारे संपूर्ण प्रचार कार्यकाळात 1.5 कोटी सूचना गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, तसेच तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि महाराष्ट्रातील प्रत्येक बूथपर्यंत मोहीम पोहोचवण्यासाठी एक लाखाहून अधिक बैठका आयोजित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील तरुण अनेक व्यासपीठांवर त्यांच्या सूचना देऊ शकतात आणि त्यांच्या सूचना, कल्पना मांडू शकतात. या मोहिमेचे स्वयंसेवक बनून विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी आपला सहभाग नोंदवता येईल, अशी माहिती भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी दिली.
तरुण पुढील मार्गाने सूचना देऊ शकतात :
आयडियाज फॉर विकसित महाराष्ट्र वेबसाइट. (http://www.viksitmaharashtra.co.in)
टोल फ्री क्रमांक 761-761-2024 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि आपल्याला SMS द्वारे लिंक प्राप्त होइल त्यावर क्लिक करुन “विकसित महाराष्ट्र” घडवण्यासाठी आपले मत नोंदवा.
भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्रचे सोशल मीडिया हँडल फॉलो करुन व QR कोड स्कॅन करुन.
भाजयुमोच्या कार्यकर्त्यांद्वारे प्रत्येक जिल्ह्यात आणि बूथवर आयोजित केलेल्या नुक्कड संवादांना उपस्थित राहून आपण आपल्या सूचना तेथे ठेवण्यात येणाऱ्या सूचना पेटीमध्ये टाकू शकता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading