तामिळनाडूला भारतापासून तोडून काढण्याचा कुटील डाव – राज्यपाल आर एन रवी
चेन्नई: वृत्तसंस्था
तामिळनाडूला भारतापासून तोडून काढण्याचा कुटील डाव राज्याचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आखला असल्याचा गंभीर आरोप राज्यपाल आर एन रवी यांनी केला आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांच्या या प्रयत्नात त्यांना यश मिळणार नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
हिंदी महिन्याच्या समारोपानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना रवी यांनी स्टॅलिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. हिंदी भाषेला विरोध करण्याच्या नावाखाली स्टॅलिन हे फुटीरता वाद जोपासत असल्याचे ते म्हणाले.
दक्षिणेतील राज्यांवर हिंदी भाषा लादली जात असल्याचा आरोप करून हिंदीला नाकारण्याच्या नावाखाली स्टॅलिन आणि त्यांचे सहकारी तामिळनाडूला भारतापासून तोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्रिभाषा सूत्राला विरोध हा केवळ त्यांचा मुखवटा आहे. देशातील इतर सर्व राज्यांनी हे सूत्र स्वीकारले आहे. तामिळनाडूला भारतापासून तोडण्याचे अत्यंत जहाल विषारी धोरण त्यांनी अवलंबले आहे. मात्र, भारताचे विभाजन करण्याच्या प्रयत्नांना कधीही यश मिळू शकणार नाही, असे राव म्हणाले.
राज्यपाल राव हे वर्णद्वेषी: मुख्यमंत्र्यांचा आरोप
एकीकडे राज्यपाल राव यांनी स्टॅलिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आरोपांची झोड उठवली असता मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी खुद्द राज्यपालांवर गंभीर आरोप केले आहेत. या कार्यक्रमात तामिळनाडूचे राज्यगीत गाईले जात असताना राव यांनी त्यातील एक वाक्य म्हणण्याचे जाणून-बुजून टाळले, असा दावा करतानाच स्टॅलिन यांनी राव हे वर्णद्वेषी असल्याचा आरोप केला आहे. या कृतीद्वारे राज्यपालांनी राष्ट्रीय एकात्मतेचा अपमानही केल्याचे स्टॅलिन म्हणाले.
