शिंदे आणि शहा यांच्यात प्रेम नसून अफेयर; त्यामुळे ते केव्हाही तुटू शकते – संजय राऊत
मुंबई: स्वपक्षातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अधिक प्रेम असल्याचे चित्र दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी जणू शहा यांचा ताबाच घेतला आहे. मात्र, शिंदे आणि शहा यांच्यात प्रेम नसून अफेयर आहे. त्यामुळे ते केव्हाही तुटू शकते, अशा शब्दात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर टीका केली.
नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महायुतीतील घटक पक्षांमध्ये वादविवाद असल्याचे स्पष्ट झाले, अशा अर्थाची वृत्त प्रसिद्ध झाली. याबाबत बोलताना राऊत यांनी महायुती अनैसर्गिक असून त्यांनी आतापर्यंत कधीही एकदिलाने काम केलेले नाही, अशी टीका केली आहे.
केवळ महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी…
सध्या राज्यात महायुतीचे घटनाबाह्य सरकार सत्तेवर असले तरीही प्रत्यक्षात भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील युती नैसर्गिक युती नाही. केवळ अखंड शिवसेना आणि अखंड राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याच्या दृष्टीने भाजपने कावा करून ही युती करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसाला कमजोर करण्यासाठी अमित शहा यांनी हे सारे घडवून आणले आहे, असा आरोप राऊत यांनी केला.
इतके खादाड सरकार बघितले नाही…
राज्यात सत्तेवर असलेल्या महायुती सरकार इतके खादाड सरकार आतापर्यंत बघितलेले नाही. इथे सगळे कमिशनवाले आहेत. मुख्यमंत्री आणि अजित पवार ४० टक्के तर देवेंद्र फडणवीस ५० टक्के अशी यांची कमिशनची वाटणी ठरलेली आहे. असे असताना महाराष्ट्राच्या वाट्याल काही येणार, असा सवाल राऊत यांनी केला. इथे प्रत्येकाला पैसा हवा आहे. इतर राज्यातील निवडणुकींसाठी पैसे उपलब्ध करण्याची जबाबदारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर देण्यात आली आहे, असा आरोपही राऊत यांनी केला.
