विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून भारत मातेचे वैभव टिकविण्याचे काम शंकर गायकर यांचे मत
पुणे : विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते भारत मातेचे वैभव टिकविण्यासाठी जगतात. आजच्या काळात हिंदू धर्मासमोर अनेक संकटे आहेत. आम्हाला मोदी, नेहरू किंवा समाजवादी पंतप्रधान नको तर मेलेला आत्मा जागृत ठेवणारा पंतप्रधान पाहिजे, असे मत विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री शंकर गायकर यांनी व्यक्त केले.
केशव शंखनाद पथकाच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त केशव सन्मान पुरस्कार सोहळ्याचे आयोजन सदाशिव पेठेतील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात करण्यात आले होते. श्री विठ्ठलराज वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक कीर्तनकार ह.भ.प. देवेंद्र महाराज निढाळकर यांना केशव सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण, केशव शंखनाद पथकाचे अध्यक्ष नितीन महाजन, उपाध्यक्ष श्रीकांत चिल्लाळ, खजिनदार रणजीत हगवणे, व्यवस्थापक काळुराम डोमाळे, महिला प्रमुख शीला गिरमे, सल्लागार सुहास मदनलाल, सदस्य शैलेंद्र भालेराव उपस्थित होते. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ११ हजार रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते.
शंकर गायकर म्हणाले, देशाचा इतिहास सगळ्यांनी अवश्य वाचला पाहिजे. रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, गाथा हे देखील प्रत्येक हिंदूने वाचले पाहिजे. यातील कथा भारत देशाला शक्तिशाली बनवतात कारण या सत्याच्या कथा आहेत. या सर्वांमध्ये प्रचंड ताकद आहे. भारत देशात अशी शक्ती आहे ज्याला शत्रुराष्ट्र देखील घाबरते. केशव शंखनाद पथक हे हिंदुत्वाचे जागरण करणारे पथक आहे. शंख पथक म्हणजे हिंदुत्वाचा बुलंद आवाज आहे, असेही त्यांनी सांगितले.
ह.भ.प. देवेंद्र महाराज निढाळकर म्हणाले, हिंदुत्वाचे रक्षण प्रत्येक जण करत असतो. भगव्या रंगाची टोपी घालणे म्हणजे हिंदुत्वाचे रक्षण नाही. काहीजण हे आपल्या पहिल्या श्वासापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत देव देश आणि धर्मासाठी आपले जीवन व्यतीत करतात. त्यांच्यासमोर आपले काम खूप छोटे आहे.
किशोर चव्हाण म्हणाले, हिंदू समाजावरील आव्हाने मोठी आहेत. उत्सवात मोठ्या संख्येने हिंदू एकत्र येतात परंतु हिंदू समाजाची तेव्हा कसोटी लागते जेव्हा संघटन दाखवण्याची खरी गरज असते आणि त्यावेळी हिंदू एकत्र येत नाहीत ही शोकांतिका आहे.
नितीन महाजन म्हणाले, लुप्त झालेली संस्कृती जपण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. शंख वादनाचे वैज्ञानिक फायदे तर आहेतच परंतु धार्मिक दृष्टीने पाहिले तर शंख वादनाने नकारात्मकता दूर होते. आपली संस्कृती जपण्याचे काम शंख वादक या माध्यमातून करीत आहेत, असेही त्यांनी सांगितले. वैष्णवी सराफ हिने सूत्रसंचालन केले.
