लोकसभेत मिळालेल्या मतांच्या आधारे महायुतीतील जागा वाटप?
मुंबई: लोकसभा निवडणुकीत घटक पक्षांना मिळालेल्या मतांच्या आधारे महायुतीतील जागा वाटपाबाबत त्वरित निर्णय घेण्यात यावा, अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. पक्षाने दीडशेहून अधिक जागा लढविण्याचा त्यांचा आग्रह ही कायम आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये भाजपने सर्वाधिक मते मिळवली आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय मतांची आकडेवारी तपासून भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी किती जागा लढवायच्या आणि इतर छोट्या घटक पक्षांना कोणत्या जागा द्यायच्या, याबाबत त्वरित निर्णय घ्यावा. आवश्यकता असेल अशा मतदारसंघात सर्वेक्षण करावे आणि आवश्यकतेनुसार महायुतीतील घटक पक्षांनी मतदारसंघांची अदलाबदली करावी, अशा मागण्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पक्षाकडे केले आहेत.
भूपेंद्र यादव करणार राज्याचा दौरा
भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या तयारी बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्राचे प्रभारी असलेले केंद्रीय नेते भूपेंद्र यादव यांनी निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याचा दौरा करावा, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार यादव हे 17 ऑगस्टपासून राज्याचा दौरा करणार आहेत. यावेळी ते जिल्हा स्तरावरील पदाधिकाऱ्यांची भेट घेणार असून त्यांना निवडणुकीच्या तयारीसाठी कानमंत्र देणार आहेत. त्याचप्रमाणे निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
