माता-भगिनींचा विश्वास हे आपले सुरक्षा कवच – उपमुख्यमंत्री अजित पवार
धुळे: महिलांची गर्दी असेल अशा ठिकाणी विशेषतः धुळे व मालेगाव या शहरात आपल्या जीवाला धोका असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी सांगितले आहे. मात्र, माता-भगिनींचा विश्वास हे आपले सुरक्षा कवच असल्याचे आपले अंतर्मन सांगते, असे उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.
अजित पवार सध्या जन सन्मान यात्रे अंतर्गत धुळे शहरात आहेत. अर्थमंत्री म्हणून दहावा अर्थसंकल्प सादर करताना आपण समाजातील प्रत्येक घटकाला, माता-भगिनी, शेतकरी, युवक या सर्वांना काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे. आपली सेवा करणे हा आमचा धर्म आहे. आपल्याला पाठबळ देण्यासाठी माता-भगिनी मोठ्या प्रमाणावर आपल्या सभांना येत आहेत, असे पवार यांनी सांगितले.
यात्रेदरम्यान राज्यभरातील अनेक माता-भगिनी आपल्याला राखी बांधत आहेत. जोपर्यंत या राख्या आपल्या हातात आहेत आणि आपल्या प्रेमाचे सुरक्षा कवच आपल्या भोवती आहे तोपर्यंत आपल्याला कोणत्याही सुरक्षेची गरज नाही, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला. माता-भगिनी आणि सर्वसामान्य जनता यांच्याशी संवाद साधण्यासाठीच जन सन्मान यात्रेचे आयोजन केल्याचेही त्यांनी सांगितले.
गरीब माता-भगिनींना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अमलात आणली आहे. त्यामध्ये अनेकांना वयोमर्यादा, कागदपत्रांची पूर्तता अशा अनेक बाबतीत अनेक अडचणी आल्या. मात्र आपण त्या प्रत्येक अडचणीतून मार्ग काढला आहे. माता-भगिनींचे भले करणाऱ्या या योजनेला विरोधकांकडून विरोध होत आहे. वास्तविक ज्यावेळी तुम्ही सत्तेत होतात त्यावेळी अशा जनहिताच्या योजना आणण्यास तुम्हाला कोणी विरोध केला होता, असा सवाल ही अजित पवार यांनी केला.
राज्यात 19 तारखेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. त्यापूर्वी 17 तारखेला योजनेत नोंदणी केलेल्या महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. या योजनेअंतर्गत तब्बल दीड कोटी पात्र महिलांच्या बँक खात्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा होतील, असेही पवार यांनी सांगितले
