पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत कायदा करून आरक्षणाची मर्यादा वाढवावी : उद्धव ठाकरे
मुंबई: आरक्षणासाठी समाजासमाजांनी एकमेकात भांडत बसण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत कायदा करून आरक्षणाची मर्यादा वाढवावी. याबाबत त्यांच्या निर्णयाला आपण पाठिंबा देऊ, अशी भूमिका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली.
मनोज जरागे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलन समाजाला इतर मागास प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी आग्रही आहेत तर इतर मागासवर्गीय समाज आपल्या आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणावर नर्माण झाला आहे.
मराठा आरक्षण आंदोलकांनी ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर निदर्शने करीत ठाकरे यांना आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. त्यांच्यासमोर देखील आपण हीच भूमिका मांडली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आरक्षणाचा प्रश्न राज्याच्या अखत्यारीत नाही
गद्दारांनी अडीच वर्षांपूर्वी आमचे सरकार पाडून सत्ता हस्तगत केल्यापासून आतापर्यंत त्यांना मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवता आलेला नाही. काही दिवसांपूर्वी सत्ताधाऱ्यांनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची एकत्रित बैठक बोलाविण्याचे नाटक केले. मात्र, राजकीय पक्षांना एकत्रित बोलावण्यापेक्षा विविध समाजाच्या नेत्यांना एकत्र बोलावून त्यांच्या चर्चेतून सहमतीचा मार्ग काढा. त्याला आमचा पाठिंबा राहील, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. मात्र, आरक्षणाचा प्रश्न राज्यांच्या अखखत्यारीत नाही, याची जाणीव देखील ठाकरे यांनी करून दिली. त्यासाठी त्यांनी बिहार सरकारने केलेल्या आणि उच्च न्यायालयाने रद्द केलेल्या कायद्याचे उदाहरणही दिले.
मागासांचे दुःख जाणणाऱ्या मोदींकडे मागा दाद
पंतप्रधान मोदी हे नेहमीच आपण इतर मागासवर्गातून पुढे आल्याचे सांगतात. आपण लहानपणी किती लहान होतो आणि मोठेपणी किती मोठे झालो, तरीही आपल्याला मागासवर्गाच्या परिस्थितीची जाणीव कशी आहे, हे देखील नेहमी सांगतात. आरक्षणाच्या प्रश्नासाठी मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी अशा समाजाने आपापसात लढण्यापेक्षा मोदी यांच्याकडे आरक्षणासाठी दाद मागावी. मोदी यांनी संसदेत आरक्षण मर्यादा वाढविण्याचा कायदा करण्याचा निर्णय घेतला तर आपण त्याला पाठिंबा देऊ, असे ठाकरे म्हणाले.
