ज्ञानाला अध्यात्माचा पाया नसेल तर ते ज्ञान समाजासाठी त्रासदायक
डॉ.पंकज उर्फ चेतनानंद महाराज यांचे मत
पुणे : भारतामध्ये जी प्रगती झाली ती विज्ञानामुळे झाली. देशाचा विकास ज्या शास्त्रज्ञांमुळे झाला, ते आध्यात्मिक असल्यामुळे देश शाश्वत विकासाच्या वाटेवर आहे. आनंदाची प्राप्ती करायची असेल तर ज्ञानातून विज्ञानाकडे आणि विज्ञानातून ज्ञानाकडे पहावे लागेल. अध्यात्म हा ज्ञानाचा पाया आहे. ज्ञानाला अध्यात्माचा पाया असावा, नाहीतर ते ज्ञान समाजाला त्रासदायक ठरते,असे मत श्री क्षेत्र भंडारा डोंगर जगद््गुरुकृपांकित डॉ.पंकज उर्फ चेतनानंद महाराज यांनी व्यक्त केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फेवब चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचन व कीर्तन महोत्सवाच्या चौथ्या दिवशी ज्ञानोबा-तुकोबांचे विज्ञान या विषयावर ते बोलत होते. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ.पंकज उर्फ चेतनानंद महाराज म्हणाले, अणु सिद्धांत मांडणारे कणाद ऋषी , वैदिक शास्त्राचे जनक सुश्रुत ऋषी, चरक ऋषी हे सगळे भारताचे आध्यात्मिक शास्त्रज्ञ आहेत. आपले वेद, उपनिषदे, ब्रम्हसूत्र, गीता, पुराण , ज्ञानेश्वरी हे विज्ञानाचा पुरस्कार करतात, म्हणून ते कालानुरुप टिकले आहेत. जात-धर्म करत बसू नका त्यापेक्षा भारतीय तत्वज्ञानामध्ये संतांनी, वैज्ञानिकांनी जी क्रांती करुन ठेवली आहे, ती जपावी लागेल, ते केवळ जपले तरी आपण सगळ्यांच्या पुढे जाऊ.
प्रवचनात श्री ज्ञानोबा-तुकोबांविषयी इतिहास व परंपरा, मानसशास्त्र, समाजशास्त्र, विज्ञान, पंढरी महात्म्य, नीतिशास्त्र, पसायदान याविषयी चेतनानंद महाराज निरुपण करणार आहेत. विश्व माऊली ज्ञानोबाराय व जगद्गुरु तुकोबाराय यांचे जीवन समृद्ध करणारे चरित्र व तत्वज्ञान यानिमित्ताने ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.
