Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा फकिरा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार – भाऊराव कऱ्हाडे


पुणे : लोकशाहीर ,साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांची अजरामर अशी ऐतिहासिक कादंबरी “फकिरा “ या कादंबरीवर आधारित चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल अशी माहिती खाडा ,बबन या यशस्वी चित्रपटाचे निर्माता ,दिग्दर्शक भाऊराव    कऱ्हाडे यांनी दिली आहे .लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मूर्तिदिनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी घोषणा केली .या कार्यक्रमाचे आयोजन मातंग एकता आंदोलनाच्या वतीने करण्यात आले होते .त्यावेळी कऱ्हाडे बोलत होते .
कऱ्हाडे म्हणाले की ,फकीरा कादंबरीवर चित्रपट निर्माण करण्याचे माझे एक स्वप्न होते .मी शालेय जीवनातच फकिरा वाचली होती .फकिराने मी भारावून गेलो होतो मी आयुष्यात कधीतरी फकिरावर काम करण्याचे ठरवले होते आता ते स्वप्न प्रत्यक्षात उतरले असून लवकर पूर्ण होणार असून या चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात झाली आहे .लवकरच हा चित्रपट सर्वांच्या भेटीला येत आहे असे त्यांनी यावेळी सांगितले . यावेळी फकिरावर चित्रपट काढत असल्याबद्दल कऱ्हाडे यांचा विशेष सत्कार माजी मंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते करण्यात आला .
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात संयोजक माजी नगरसेवक अविनाश बागवे म्हणाले की .अतिशय हलाखीच्या आणि गरीब परिस्थित राहून पुण्यातील झोपडपट्टीत रहाणाऱ्या विद्यार्थ्यांनी दहावी व बारावीत अतिशय चांगले गुण मिळवले त्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी मातंग एकता आंदोलन दरवर्षी त्यांना मदत आणि विशेष सत्कार समारंभ करीत असते .त्यांनी यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना भविष्यातील संधीविषयी मार्गदर्शन केले .
जेष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.अविनाश सांगोलेकर यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर आधारित व्याख्यान दिले .तमाशाचे नाव लोकनाट्य ठेवून त्यातून समाजप्रबोधनाचे कार्य करण्याची संकल्पना अण्णा भाऊ साठे यांनी मांडली .तसेच अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्ण जीवनचरित्रावर प्रकाश टाकत त्यांनी उपस्थित समुदायाला आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
माजी मंत्ती रमेश बागवे यांनी मातंग एकता आंदोलन या संघटनेची माहिती आणि इतिहास सांगितला .आज सर्व समाज एकजुटीने राहणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले .गेल्या महिनाभरात राज्यात मातंग समाजावर अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे सांगितले. हा अन्याय अत्याचार थांबविण्यासाठी समाजाने एकत्र येऊन आपली ताकत दाखवणे काळाची गरज असल्याचे मत रमेश बागवे यांनी मांडले . समाजाने आता एकत्र येणे काळाची गरज असून सर्वांनी एकत्र या असे आवाहन त्यांनी. केले .
या कार्यक्रमास निर्माता ,दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे,जेष्ठ साहित्यिक डॉ .अविनाश सांगोलेकर ,माजी नगरसेवक अविनाश बागवे ,अंकल सोनवणे ,विठ्ठल थोरात ,सुरेखा खंडगळे ,अरुण गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते .या कार्यक्रमास पुणे शहर व जिल्ह्यातील मातंग समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading