चार महिन्यात केंद्रात सत्तापालट होईल : जयंत पाटील
सातारा: केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्या वेळी सरकार स्थापन झाले असले तरी केवळ चार महिन्यात केंद्रात सत्तापालट होईल आणि पृथ्वीराज चव्हाण केंद्रीय मंत्रिमडळात जातील. त्याचा फायदा महाराष्ट्राला होईल, असे उद्गार शेतकरी कामगार पक्षाचे सरचिणीस जयंत पाटील यांनी काढले.
लोकनेते विलासकाका उंडाळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि कोयना बँकेच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन समारंभात जयंत पाटील बोलत होते. ज्या भूमीत यशवंतराव मोहिते यांनी आम्हाला मार्क्सवादाचे धडे दिले त्या भूमीत भाजपची विचारसरणी रुजत असल्याबद्दल खेद वाटतो, असेही ते म्हणाले.
केंद्रातील सरकार केवळ चार महिने टिकणार असून त्यानंतर इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येईल. पृथ्वीराज चव्हाण केंद्रीय मंत्री असतील. त्यांनी अनेक वर्ष दिल्लीत काम केले आहे. त्यांच्या अनुभवाचा महाराष्ट्राला फायदा होईल, असे पाटील यांनी नमूद केले. आपण इंडिया आघाडीचे घटक म्हणून हे बोलत आहोत, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.
नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवणुकीत पाटील यांचा पराभव झाला आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पुरस्कृत केले होते. ते सलग पाच कार्यकाळ अर्थात 24 वर्ष विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत. रायगड जिल्ह्यात त्यांची मोठी ताकद आहे. सर्वपक्षीय राजकारण्यांमध्ये पाटील यांना आदराचे स्थान आहे. त्यामुळेच त्यांनी केंद्र सरकारबाबत व्यक्त केलेल्या मताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
