पोटनिवडणुकीतून भाजप बद्दल असणारी भीती आणि भ्रम दूर झाले – राहुल गांधी
नवी दिल्ली: सात राज्यातील विधानसभांच्या पोटनिवडणुकांचा निकाल आल्यानंतर भारतीय जनता पक्षाबद्दल असणारी भीती आणि भ्रम दूर झाले आहेत, अशा शब्दात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक निकालाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सात राज्यात विधानसभांच्या 12 रिक्त जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत केंद्रात सत्तारूढ असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांना केवळ दोन जागा मिळाल्या तर इंडिया आघाडीने तब्बल दहा जागांवर विजय मिळवला. इंडिया आघाडीच्या अनेक नेत्यांनी या विषयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
देशातील गरीब, शेतकरी, कामगार, युवक, नोकरदार, मजूर, व्यापारी या सर्व समाजघटकांना देशातील दडपशाहीचा संपूर्ण विनाश करून देशात न्यायाचे राज्य प्रस्थापित करायचे आहे. आपल्या आयुष्यात प्रगती साधण्यासाठी आणि संविधानाच्या संरक्षणासाठी जनता ठामपणे इंडिया आघाडीच्या पाठीशी उभी आहे, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी समाज माध्यमातून प्रसिद्ध केली आहे.
पराभवापासून भाजपने बोध घ्यावा : एम के स्टॅलिन
जनतेच्या प्रादेशिक भावनांचा आदर केल्याशिवाय, त्यांचा सन्मान केल्याशिवाय राज्य करता येत नाही आणि पक्षही चालवता येत नाही, याचा बोध भाजपने या निवडणुकांच्या निकालातून घेतला पाहिजे, असे मत द्रविड मुन्नेत्र कळघमचे अध्यक्ष आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी व्यक्त केले. आम्ही लोकांबरोबर आहोत आणि लोक आमच्या बरोबर आहेत, असा दावाही त्यांनी केला.
