नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी केली ‘ही’ मागणी
नवी दिल्ली: देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा स्थापन झालेल्या सरकारला बहुमतासाठी टेकू देणाऱ्या संयुक्त जनता दल आणि तेलगू देशम या पक्षांचे नेते नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी केंद्र सरकारकडे 50 हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. देशाचा अर्थसंकल्प 23 जुलै रोजी संसदेत सादर केला जाणार आहे. त्यापूर्वी या नेत्यांनी आपली मागणी केंद्रापर्यंत पोहोचविली आहे
‘अब की बार चारसो पार,’चा नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपला संयुक्त जनता दल आणि तेलगु देशमची मदत घ्यावी लागली. या मदतीचा मोबदला राज्यांना निधीच्या स्वरूपात हे दोन्ही पक्ष पुरेपूर वसूल करणार हे निश्चित आहे.
तेलंगणाला प्रामुख्याने आपली नवी राजधानी अमरावती बसविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे सिंचन प्रकल्पांसाठी देखील निधीची आवश्यकता असल्याचे तेलंगणा सरकारने केंद्राला सांगितले आहे. बिहार सरकारला राज्यात नवे 9 विमानतळ, दोन नद्यांवर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी आणि सात नवी वैद्यकीय महाविद्यालय यासाठी मोठा निधी हवा आहे.
