राम नदी उगम क्षेत्रात फुलपाखरू उद्यानाची निर्मिती!
पुणे : भुकूम मधील रामेश्वर मंदिर हे राम नदीचे उगमस्थान. या क्षेत्रात 1972 च्या जीवघेण्या दुष्काळात, ग्रामस्थांनी उभारलेला खाटपेवाडी तलाव येथे ‘किर्लोस्कर वसुंधरा’ च्या वतीने व भुकूम ग्रामपंचायत तसेच अन्य स्वयंसेवी संस्थाच्या सहकार्याने,2019 पासून ‘राम नदी पुनरुजीवन अभियान ‘ सुरु आहे.
याचाच एक भाग म्हणून फुलपाखरू उद्याना साठीचा वृक्षारोपण सोहळा आज संपन्न झ्हाला. रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूड चे नवनिर्वाचित अध्यक्ष मनीष दीडमिशे यांच्या हस्ते झालेल्या कार्यक्रमात भुकूम चे उपसरपंच निलेश नन्नावरे, मॉडर्न कॉलेज गणेशखिंड चे प्राचार्य डॉ. संजय खरात, तसेच मित्राकिडा फौंडेशन चे डॉ. राहुल मराठे, किर्लोस्कर वसुंधराचे वीरेंद्र चित्राव, प्रसाद भारतवंश, ‘अल्काय’ चे रवि आणि अलका कुलकर्णी, गिरीश व अनुपमा क्षीरसागर आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ संजय खरात आणि डॉ राहुल मराठे म्हणाले ‘ फुलपाखरू उदयान हे राम नदीचे आगळे वेगळे आकर्षण ठरणार असून अनेकविध झाडे व फुलांमुळे सुमारे 40 जातींची फुलपाखरे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आकर्षित होतील असा अंदाज आहे. कडीपत्ता, पारिजातक, कोरंटी, रुई, पान फुटी, कण्हेर, लेमन, जासवंद, दिन का राजा, जात्रौपा अशा सुमारे 50 पेक्षा जास्त प्रजातींची सुमारे 500 झाडे लावण्यात आली. या उदयानामुळे खाटपेवाडी तलाव क्षेत्रात फुलपाखरांचा मोठा अधिवास निर्माण होणार आहे. या फुलपाखरां मुळेच अन्य झाडांचे परागीकरण सुकर होणार असून निसर्ग अभ्यासासाठीची मोठी पर्वणी निर्माण झाली आहे. ‘
रवि कुलकर्णी म्हणाले ‘ मान्सून च्या आगमनाची तयारी पूर्ण झाली असून पावसा पूर्वीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. राम नदीचे उगमक्षेत्रातील पाणी शुद्ध व्हावे यासाठी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने सातत्याने गेली 5 वर्षे प्रयत्न केले जात असून त्याला चांगले यश प्राप्त झाले आहे. धरणातील गाळ काढण्यात आला असून त्यामुळे पाणी धारण करण्याची क्षमता सुमारे 40 टक्क्यानी वाढली आहे. सुमारे 350 स्थानिक देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले असून त्याचे योग्य ते संगोपन केल्याने बरीचशी झाडें 15 फुटा पेक्षा जास्त उंच वाढली आहेत. जैवाविविधता अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले असून मोठ्या प्रमाणात नवनवीन पक्षांचे आगमन होत आहे, झाडांवर पक्षी घरटी करीत आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या अधिवासासाठी बनविलेल्या बेटांवर मोठया प्रमाणात प्रजनन होऊ लागले आहे. तलावतील जैवविविधतेची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत.खाटपेवाडी तलावातील पाण्याची गुणवात्ता सुधारली असून पाण्याची ऑक्सिजेन पातळी 8 ppm झाली आहे. माश्यांचे प्रमाण वाढले असून पाणवनस्पती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.’
किर्लोस्कर वसुंधराचे संयोजक वीरेंद्र चित्राव म्हणाले ‘जगात कोणताही पाणवठा पुनरुजीवित करायचा असेल तर त्या साठी ‘पर्यावरण पूरक पुनरुज्जीवन’ कसं करायचं? याचं एक मानचित्र आम्ही तयार केले असून या मार्गदर्शक तत्वाच्या आधारे हे काम चालू आहे. भुकूम ग्रामपंचायत, स्थानिक रहिवासी, सुमारे 15 संस्था, 33 महाविद्यालये , 25 शाळा, पर्यावरणतज्ज्ञ इत्यादीच्या सक्रिय सहभागामुळेच हे यश प्राप्त झाले आहे. आगामी काळात, आधुनिक तंत्राचा वापर करून, 19.2 किमी लांबीची हि दुर्लक्षित नदी अविरल व निर्मल करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू ‘.
हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी डॉ प्राची क्षीरसागर, सुवर्णा भांबूरकर, सुषमा कुलकर्णी, राहुल खांडेकर, तुषार सरोदे, अर्जुन नाटेकर यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.
