अर्थसंकल्प सभागृहात सादर होण्यापूर्वीच फुटला – संजय राऊत
मुंबई: राज्याचा अर्थसंकल्प सभागृहात सादर होण्यापूर्वीच फुटला आहे. खुद्द सरकारनेच तो फोडला आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. मात्र यापुढील काळात सरकारच्या आश्वासनांना जनता भुलणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
राज्य सरकारने कितीही घोषणा केल्या तरी त्यातून काही निष्पन्न होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी अनेक आश्वासने दिली. मात्र, राज्यातील जनतेने त्यांच्यावरही विश्वास ठेवला नाही तर राज्यातील सरकारवर काय विश्वास ठेवणार, असा सवालही राऊत यांनी केला.
आमचे हात अपवित्र करणार नाही
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या लिफ्टमधील पाच मिनिटाच्या भेटीचे राजकीय अर्थ काढू नयेत. लिफ्टने एकत्रच जावे लागते. अनेकदा संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे देखील लिफ्ट मध्ये आमच्याबरोबर असतात. याचा अर्थ भाजप आणि शिवसेना एकत्र येणार असा होत नाही. पुन्हा भाजपशी हात मिळवणी करून आम्ही आमचे हात अपवित्र करणार नाही, असे राऊत म्हणाले.
