देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात कुरूप चेहरा – विधीज्ञ असीम सरोदे
पुणे: महाराष्ट्रात सर्वाधिक असंवैधानिक, बेकायदेशीर राजकारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून आजच्या घडीला तोच महाराष्ट्रातील सर्वात कुरूप चेहरा आहे, अशी टीका विधीज्ञ असीम सरोदे यांनी केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही त्यांनी धारेवर धरले.
महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी फोडले. एकीकडे नार्वेकर हा पक्ष फुटीचा प्रकार नसून पक्षांतर्गत वादाचा प्रकार आहे. त्यामुळे तो पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत येत नाही, असा दावा करीत आहेत. दुसरीकडे फडणवीस यांनी एका मुलाखतीत, मी गेलो, येईल येईन म्हणताना दोन पक्ष फोडून आलो, असे स्वतःच सांगितले आहे. हे फोडाफोडीचे राजकारण महाराष्ट्राला मान्य नाही, असा दावा सरोदे यांनी केला आहे.
महाराष्ट्रात दुहेरी लाट
लोकसभा निवडणुकीच्या वेळी देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लाट होती. त्याचवेळी महाराष्ट्रात मात्र दोन लाटा होत्या. नरेंद्र मोदी विरोधी एक लाट आणि देवेंद्र फडणवीस विरोधी दुसरी लाट महाराष्ट्रातील मतदारांमध्ये होती, असेही सरोदे म्हणाले.
… तर सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहायचे
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रश्न पक्षांतर बंदी कायद्यात बसत नसल्यामुळे आपण शेड्युल 6 अंतर्गत तो हाताळू शकत नसल्याचा नार्वेकर यांचा दावा आहे. हा प्रश्न जर तुम्ही हाताळू शकत नाही तर सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहून हस्तक्षेप करण्यास का सांगितले नाही, हा सवाल एक नागरिक म्हणून नार्वेकर यांना विचारणे आवश्यक आहे, असे मतही सरोदे यांनी व्यक्त केले.
अवैध सरकार आमच्या बोकांडी
राहुल नार्वेकर, देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी हे सगळे संविधानाचे दोषी आहेत. त्यांनी बेकायदेशीर सरकार आमच्या बोकांडी बसवले आहे. हा संविधानाचा द्रोह आहे. ते संविधानाचे गुन्हेगार आहेत. त्यांची संविधानावर निष्ठा नाही. त्यामुळेच त्यांना संविधान बदलायचे आहे, असे आरोपही सरोदे यांनी केले.
