भाजपने घेतली लोकसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवारांची बैठक
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या परीक्षेत नापास झालेल्यांची शाळा भारतीय जनता पक्षाने भरवली असून त्यांच्या अपयशापासून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी धडे घेण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष महायुतीला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.. या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी लोकसभेची निवडणूक हरलेल्या उमेदवारांची बैठक पक्षाच्यावतीने आयोजित करण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्वच पराभूत उमेदवार उपस्थित होते.
या निवडणुकीतील पराभवाचे नेमके कारण काय, नेमक्या कोणकोणत्या विधानसभा मतदारसंघातून पक्षाच्या उमेदवाराला कमी प्रतिसाद मिळाला, महायुतीतील घटक पक्षांपैकी कोणत्या पक्षाच्या नेते कार्यकर्त्यांनी उमेदवाराला साथ दिली आणि कोणत्या पक्षाच्या नेते कार्यकर्त्यांनी दिली नाही, पक्षातील कोणत्या नेत्यांनी उमेदवारासाठी निष्ठापूर्वक काम केले आणि कोणत्या नेत्यांनी ऐनवेळी हात वर केला, इतर पक्षाला सहाय्य केले, नाराजीला कारणीभूत ठरलेले स्थानिक मुद्दे कोणते, या सर्व बाबी पराभूत उमेदवारांनी पक्षाच्या बैठकीत मोकळेपणाने मांडल्या.
या सर्वातून बोध घेऊन उर्वरित कालावधीत चुका दुरुस्त करून, मित्र पक्षांची स्थानिक पातळीवर संवाद प्रस्थापित करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत यश मिळवायचे आणि लोकसभा निवडणुकीतील अपयशाचे उट्टे काढायचे, असा निर्धार भाजपने केला आहे.
