महायुतीत खडे टाकण्याचे काम करू नये – सूरज चव्हाण
मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मध्ये करण्यात आलेल्या टीकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या बुजुर्ग नेत्यांकडून संयत प्रतिक्रिया व्यक्त होत असली तरीही नव्या दमाच्या नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. महायुतीशी थेट संबंध नसलेल्या संघाच्या विचारवंतांनी महायुतीत खडे टाकण्याचे काम करू नये, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी दिला आहे.
महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना शिंदे गट पूर्ण बहुमतात असताना अजित पवार यांना सोबत घेण्याची काय गरज होती, असा सवाल ऑर्गनायझर मधील लेखात करण्यात आला आहे आगामी दोन-तीन वर्षात अंतर्गत दुपारीमुळेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची शक्ती क्षीण झाली असती, असा दावाही या लेखात करण्यात आला आहे.
निवडणुकीत चांगले यश मिळाले तर त्याचे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उत्तम नियोजनाला, आणि अपयश पदरी पडले तर त्याचे अपश्रेय अजित पवार यांना, असा दुटप्पीपणाचा चालणार नाही. लिहिता बोलता आम्हालाही येते, अशा शब्दात सूरज चव्हाण यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र, हा लेख आपण वाचला नसल्याचे संगत संयत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संघाची भूमिका काहीही असली तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्याच्या मनात राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीत सामावून घेतल्या बाबत खेद अथवा पश्चातापाची भावना दिसून येत नाही. शपथविधीच्या निमित्ताने झालेल्या दिल्ली दौऱ्यात गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह यांच्यापासून अनेक दिग्गज भाजप नेत्यांच्या भेटी गाठी आणि बैठका झाल्या. त्यात कोणाकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आलेली नाही, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. आगामी विधानसभा निवडणूक आपण महायुती म्हणून एकसंध पणाने लढू, असेही त्यांनी सांगितले.
