कृषी पर्यटन विकसित भारताच्या दिशेने टाकलेले पाऊल – शमा पवार
पुणे : “युवा पिढीला शेती व्यवसायाशी जोडण्यासाठी, तसेच कृषी आधारित रोजगार निर्मितीसाठी शेतीला कृषी पर्यटनाची जोड द्यायला हवी. कृषी पर्यटन हा एक उत्तम पर्याय असून, विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल आहे,” असे प्रतिपादन पर्यटन संचालनाच्या उपसंचालक शमा पवार यांनी केले. कृषी पर्यटनामध्ये येऊ पाहणाऱ्या युवकांसाठी गणेश चप्पलवार यांचे पुस्तक उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त परभन्ना फाउंडेशन व ऍग्रो टुरिझम विश्व यांच्यातर्फे ‘कृषी पर्यटनातील संधी, शासकीय योजना व आर्थिक सहाय्य’ या विषयावर आयोजित परिसंवादात पवार बोलत होत्या. यावेळी वल्लरी प्रकाशनतर्फे गणेश चप्पलवार लिखित ‘कृषी पर्यटन उद्योजकांची यशोगाथा’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. प्रसंगी सातारा जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्विसचे संचालक डॉ. महेश ठाकूर, शिल्पा पाठक, व्यंकटेश कल्याणकर आदी उपस्थित होते.
परिसंवादामध्ये आनंद कृषी पर्यटन केंद्राचे आनंद शिंदे, मेघ मल्हार कृषी पर्यटन केंद्राचे किरण घाटे, सिनाई कृषी पर्यटन केंद्राचे लहू अवताडे आणि आजरा कृषी पर्यटन केंद्राचे जितेंद्र नवार सहभागी झाले. तेजाली शहासने यांनी संचालन केले. मधुबन कृषी पर्यटन (तृणीत कुथे), कल्पतरु कृषी पर्यटन केंद्र (विनोद बेले), मेघमल्हार कृषी पर्यटन केंद्र (कालिदास इंगवले), आजरा कृषी पर्यटन (जितेंद्र नवार), ओमकार कृषी पर्यटन (गणेश उत्तेकर), नंदग्राम कृषी व गौ पर्यटन केंद्र (अभिलाष नागला), असळज कृषी पर्यटन केंद्र (महेश पेजळेकर), नेचर स्टे कृषी केंद्र पर्यटन (भक्ती म्हात्रे), आनंद कृषी पर्यटन केंद्र (आनंद शिंदे), इको व्हिल द फार्म कृषी पर्यटन (ऋतुजा अचलारे), अंजनवेल कृषी पर्यटन केंद्र (रमेश जगताप), पराशर कृषी पर्यटन केंद्र (मनोज हाडवळे), सिनाई कृषी पर्यटन केंद्र (लहू अवताडे) यांना ‘कृषी पर्यटन यशोगाथा पुरस्कार २०२४’ने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनील धनगर यांनी केले. भाग्यश्री वठारे यांनी आभार मानले.
