Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

कोरेगाव पार्क- बंडगार्डन मधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मोहन जोशी पुन्हा एकदा धावले

पुणे : साधू वासवानी पुलाच्या प्रस्तावित पाडकामा साठी पुलावरील वाहतूक बंद करून वाहतूक विभागाने कोरेगाव पार्क-बंडगार्डन भागात वाहतुकीचे मोठे बदल केले आहेत. या मुळे गेल्या शनिवारपासून या भागातील रहिवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावाच लागत आहे. शनिवार रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी या वाहतूक कोंडी चा कळसच झाला होता ज्या मुळे या भागात दिवसभर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. बंडगार्डन रस्ता, मंगलदास रस्ता यावर एकेरी वाहतूक तसेच बऱ्याच ठिकाणी या भागातील रस्ते बॅरिकेड टाकून वाहतूक विभागा तर्फे बंद करण्यात आलेले आहेत. वाहनांची अचानक वाढलेली मोठी वाहतूक, रस्त्यांची अपुरी क्षमता, वाहतूक पोलिसांची नेहमीची कमतरता, हे बदल करताना स्थानिक रहिवाशांशी चर्चा न करणे, करण्यात आलेल्या बदलांमुळे प्रवासाचे वाढलेले अंतर व वेळ, ट्रांसलेट ट्रॅफिक मुळे स्थानिक रहिवाशांचे होणारी मोठी गैरसोय या मुळे या भागातील नागरिकांना, विशेषतः जेष्ठ नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करायला लागत आहे. गेल्या पाच महिन्यापासून करण्यात आलेल्या विविध प्रयोगानंतर देखील कुठलीही ठोस व प्रभावी उपाययोजना वाहतूक विभागातर्फे करण्यात येऊ नये याविषयी स्थानिक नागरिकांची मोठी तक्रार होती.
पुण्यातील रस्ता वाहतुकीच्या समस्या सोडवण्या साठी नागरिकांच्या सहभागातून ‘वेक-अप पुणेकर’ हे अभियान मा. आमदार मोहन दादा जोशी प्रभावीपणे चालवीत आहेत. बंडगार्डन-कोरेगाव पार्क मधील स्थानिक रहिवाशांना या वाहतूक बदलां मुळे निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी मा. आमदार मोहनदादा जोशी पुन्हा एकदा धावून आले. मोहल्ला कमिटी सदस्य धैर्यशील वंडेकर यांच्या प्रयत्नातून आयोजित या बैठकीत त्यांनी कोरेगाव पार्क, बोट क्लब, बंड गार्डन या विभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यावर चर्चा करून काही उपाय योजले. बैठकीत नागरिकांनी केलेल्या सूचना व योजलेले उपाय यांची अंमलबजावणी करण्यासाठी मोहनदादा जोशी तातडीने डीसीपी ट्रॅफिक यांची भेट घेणार आहेत.

स्थानिक रहिवाशांची मागणी होती की वाहतूक पोलिसांतर्फे यापूर्वी केलेले प्रयत्न यशस्वी न झाल्यामुळे ट्रायल बेसिसवर साधू वासवानी पुलावरील वाहतूक बंद केल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या बदल न करता वाहतूक आहे तशी चालू ठेवावी. यामुळे गर्दीच्या वेळी वाहतूक जरी धीम्या गतीने झाली तरी यामुळे कोंडी होण्याची शक्यता फार कमी आहे. सध्या वाहतूक विभागातर्फे करण्यात आलेल्या बदलांमुळे फार मोठी वाहतूक कोंडी होत आहे व प्रवासी एक ते दोन तास वाहतुकीत अडकून पडत आहेत. बैठकीतील चर्चेअंती सर्वानुमते हे ठरविण्यात आले की डीसीपी ट्रॅफिक यांना मंगलदास रोड बंडगार्डन रोड जे एकेरी करण्यात आले आहेत ते पूर्ववत करण्यात यावेत. तसेच प्रायोगिक तत्त्वावर वाडिया कॉलेज चौक ते जहांगीर चौक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करून त्या बाजूस जाणारी वाहतूक ही वाडिया कॉलेज वरून डावी कडून पुढे, रेसिडेन्सी क्लब चौकातून उजवीकडे वळून पुन्हा अलंकार चौकातून उजवी कडे वळून जहांगीर चौकात येता येईल अशी करण्याचे एकमत झाले. शाळा सुरू झाल्यानंतर या भागात वाढणारी शाळेच्या बसेस रिक्षा गाड्या इत्यादींची वाहतूक लक्षात घेता या शाळांना बसेस, ऑटो रिक्षा इत्यादी रस्त्यावर पार्क न करता त्यांच्या आवारात पार्क करण्याचे तसेच या भागातील शाळांनी एकाच वेळी शाळेची वेळ न ठेवता शाळांनी थोड्याफार फरकाने आपल्या वेळा ठरवणे यासाठी पण शाळेच्या मॅनेजमेंट बरोबर बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

स्थानिक रहिवाशां तर्फे धैर्यशील वंडेकर यांनी मा. आमदार मोहनदादा जोशी हे तात्काळ मदतीस धावून आल्या बद्दल त्यांचे सर्व रहिवाशां तर्फे आभार मानले. उपस्थित नागरिकांनी मा. आमदार मोहनदादा जोशी यांनी पुणेकरांच्या वाहतूक समस्या सोडवण्यासाठी घेतलेला पुढाकार व चालवीत असलेले ‘वेक-अप पुणेकर’ अभियाना बद्दल धन्यवाद दिले. या अभियानाची माहिती घेऊन आपल्या भागातील रस्ता वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्यासाठी सहभाग होण्याची तयारी नागरिकांनी दाखवली.

या बैठकीस धैर्यशील वंडेकर, डॉ. विद्या दामले, समीर रूपानी, भारती पाटील, साथी नैयर, डॉ. बोरगावकर, मनोज फुलपगार, शुभांगी, अमृता चंदानी, मल्लिका साबुनानी, अनाहिता आणि व इतर नागरिक उपस्थित होते. बैठकीस महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading