Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRA

फक्त वेळ मारून नेऊन आपला विकास होणार नाही; आमदार पाटील यांची ओमराजे यांच्यावर टीका

धाराशिव : आज आपल्या भागातील जे विद्यमान खासदार आहेत. त्यांनी गेल्या पाच वर्षात धाराशिवसाठी काय केले? कोणता प्रस्ताव केंद्रात पाठवून निधी आणला? विकासकाम आपल्या भागात झाली का? त्यामुळे आपल्याला आता फक्त रडारडी, नौटंकी करण्यापलीकडे जाऊन काम करणारा लोकप्रतिनिधी आवश्यक आहे. फक्त वेळ मारून नेऊन आपला विकास होणार नाही, अशा शब्दात भाजप नेते राणाजगजितसिंग पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर नाव न घेता टीका केली. अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या एका साखर कारखान्यात आयोजित कर्मचारी सभेत राणाजगजितसिंह पाटील बोलत होते.

राणाजगजितसिंग पाटील म्हणाले की, “पूर्वी आपल्या भागात साखर कारखाने नव्हते. मग ते कसे आले. ? तर डॉ. पद्मसिंह पाटील, मोठे काका यांनी केलेल्या कामामुळे आज आपल्याकडे साखर कारखाने आले. शेतकऱ्यांची आर्थिक सुबत्ता आली. पुढे एक एक साखर कारखाना येथे उभा राहिला. दरम्यानच्या काळात कृष्णा खोरे प्रकल्पातील आपल्या हक्काचे 21 टीएमसी पाणी आरक्षित करण्यासाठी डॉ. पद्मसिंह पाटलांनी आपली संपूर्ण ताकद लावली. त्यांची पद्मसिंह पाटलांना खूप मोठी राजकीय किंमत मोजावी लागली. आता आपल्याला त्यातील केवळ 7 टीएमसी पाणी मिळत आहे. त्याच काम सुरू आहे. हे पाणी आता परांडा, वाशी, कळंब, तुळजापूरला मिळणार आहे”.

पुढे बोलताना ते म्हणाले की, पुढील काळात आपल्याला धाराशिवमध्ये मोठे उद्योग आणायचे आहेत. यासाठी या राखीव पाण्याचा उपयोग होणार आहे. कोंडगाव भागात अडीज हजार एकरची एमआयडीसी आपण विकसीत करीत आहोत. तसेच सोलापूर आणि बार्शीच्या बाजूला देखील एमआयडीसी होणार आहे. यासाठी मोठा निधी आवश्यक असून केंद्र सरकारकडून सहकार्य मिळाले तर हे प्रकल्प लवकर पूर्ण होतील. त्यातून मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती ही होईल. त्यामुळे आता मतदारांनी भूमिका घेण्याची वेळ आली आहे. काम करणारे विकासपुरूष नरेंद्र मोदी यांच्या मागे उभे राहण्याची ही वेळ आहे. तेव्हा महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना मतदान करा, असे आवाहनही राणाजगजितसिंग पाटील यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading