त्यामुळेच गीतेंना आमच्यावर टीका केल्याशिवाय रात्री झोप येत नाही – भरत गोगावले
रायगड : रायगड लोकसभा निवडणुकीचा प्रचार दोन्ही बाजूनी जोरात सुरू आहे. या प्रचार वैयक्तिक आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. ”ज्यांच्या विहरीत पाणी नाही त्याच्या विहिरीत पोहरा टाकून उपयोग नाही. अनंत गीतेंना निवडून आणण्यासाठी आम्ही मागील सहा वेळा जीवाच रान केलं आहे. आज अनंत गीते ते विसरले आहेत. त्यामुळेच त्यांना आमच्यावर टीका केल्याशिवाय रात्री झोप येत नाही. त्यांना त्यांचा पराभव दिसू लागला आहे, अशी टीका आमदार भरत गोगावले यांची अनंत गीते यांच्यावर केली.
रायगड मतदार संघातील 6 पैकी 5 आमदार हे आमच्या महायुतीच्या घटक पक्षातील राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपचे आहेत. त्यामुळे गीतेंना त्यांचा पराभव समोर दिसत आहे. आज कार्यकर्त्यांचा शिवसेनेत झालेला पक्ष प्रवेश हा महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या विजयाची नांदी सल्याचे भरत गोगावले म्हणाले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना भरत गोगावले म्हणाले, संजय राऊत हे नेहमीच आमच्यावर टीका करत असतात. पण त्यांनी केलेल्या टीकेच्या अगदी उलट घडतं. मागील वर्षभरात त्यांनी किती वेळा सांगितले की महायुतीचे सरकार पडेल. पण आज ही आमचे सरकार सत्तेत आहे. आज जर ते म्हणत असतील की आमचा एकही उमेदवार निवडून येणार नाही तर नेमक त्याच्या उलट होईल. यंदा आम्ही महायुती म्हणून सर्वच्या सर्व 48 जागांवर निवडून येऊ असा, विश्वास देखील गोगावले यांनी यावेळी व्यक्त केला.
