भोर वेल्हामधील एमआयडीसीचा प्रश्न महिनाभरात निकाली काढू – अजित पवार
भोर : मला विकासाची आवड आहे. मला कामाची आवड आहे. म्हणून मी विकासासोबत निघालो आहे. मी जेव्हा 91 साठी खासदार झालो तेव्हा पिंपरी चिंचवड हवेली परिसराचा कायापालट केला, अनेक विकासाच्या गोष्टी मी इथे केल्या. याचा अर्थ विकास आम्ही करतो नुसती वेळ मारून येत नाही. तुम्ही ज्या आमदाराला 2019 मध्ये निवडून दिले त्यांनी तुम्हाला एमआयडीसी बनवून देतो, असे आश्वासन दिले होते. मात्र, ते आजही पूर्ण झालेले नाही. मग तोच आमदार पुन्हा मत मागायला कसा येतो? माझ्यासारख्याला तर लाजच वाटली असती, अशी टीका अजित पवार यांनी भोर वेल्हे येथील आमदार संग्राम थोपटे यांच्यावर नाव न घेता केली. तसेच आचासंहिता उठल्यावर आपण येथील एमआयडीसीचा प्रश्न महिनाभरात मार्गी लावू, असे आश्वासन देखील दिले.
बारामती लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेत भोर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले,आम्ही पण शेतकरी आहोत. आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारी माणस नाहीत. पण एमआयडीसी करायची म्हटली की त्याला जागा जास्त लागते त्यामुळे जी बिगर शेतीची जागा आहे व मोकळी मोठी जागा आहे, अशा जागा एमआयडीसीसाठी आवश्यक आहेत. त्या बदल्यात आपण शेतकऱ्यांना जास्ती पटीने मोबदला देखील देऊ.
पुढे बोलताना ते म्हणाले, धरण आपल्या उशाशी पण आपण उपाशी, अशा भावना आज भोर वेल्हेकरांच्या आहेत. मात्र गुंजवणीच्या धरणाचे पाणी वाटप झालेला आहे. पाणी वाटप करताना तुमच्या हक्काचं पाणी इतरांना कोणालाही देणार नाही. विरोधकांकडून या संदर्भात चुकीचा प्रचार सुरू आहे. मात्र तुमच्या हक्काचं पाणी कोणीही पळवणार नाही, याची खात्री बाळगा, असा शब्द देखील अजित पवार यांनी यावेळी दिली.
अजित पवार म्हणाले, बारामतीत काही लोकांनी मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली आणि ती काम त्यांनी केली तसे लोकांना सांगितलं, मग तुम्ही भोर वेल्हामध्ये काय विकास काम केली? हे आता सांगा असे म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता टीका केली. तसेच नुसती भाषण करून काय उपयोग नाही. त्यासोबत कृती करणे देखील गरजेचे आहे आणि त्यासाठी प्रशासनात असणे गरजेचे आहे, असे ही ते म्हणाले.
