Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

सातत्यपूर्ण अभ्यासातून वैचारिक साक्षरता निर्माण व्हावी ; कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांचे प्रतिपादन

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 18 तास अभ्यास अभियानाचे उद्घाटन; कुलगुरूंनी स्वत: विद्यार्थ्यांबरोबर बसून केला अभ्यास

पुणे: जयकर ग्रंथालयाला मोठा वारसा असून येथून खूप मोठी माणसं घडलेली आहेत, अशा या वास्तूत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सलग 18 तास अभ्यास करण्याचा रावविला जात असलेला उपक्रमात स्तुत्य आहे.मात्र,विद्यार्थ्यांनी केवळ एक दिवस नाही तर वर्षभर या अभ्यासात सातत्य ठेवावे.तसेच आजच्या डिजिटल युगात वाचन संस्कृती व लेखन संस्कृती खूप महत्वाची असून अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एक वैचारिक साक्षरता निर्माण व्हावी,असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांनी शनिवारी केली.तसेच या कुलगुरूंनी स्वत: काही तास ग्रंथालयात विद्यार्थ्यांबरोबर बसून अभ्यास केला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पोस्ट-पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडन्टस् असोसिएशन (डाप्सा)तर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित ’18 तास अभ्यास अभियाना’च्या उद्घाटन प्रसंगी डॉ. सुरेश गोसावी बोलत होते.यावेळी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ.विजय खरे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ.अभिजीत कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ.सदानंद भोसले,अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विलास आढाव,अधिसभा सदस्य राजेंद्र घोडे, मुकुंद पांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष डॉ. सुनील धिवार , मोहन कांबळे, डाप्साचे अध्यक्ष अमोल सरोदे आदी उपस्थित होते.

कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी म्हणाले, मी स्वत:ला विद्यार्थीच समजतो.तसेच विद्यार्थी म्हणून आपण एकमेकांकडून काही शिकत असतो.सलग 18 तास बसून अभ्यास करण्याच्या उपक्रमाकडे आपण वेगळ्या प्रकारे पाहणे गरजेचे आहे.लहान मुलांना कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवून ठेऊन आई मुलांची एकाग्रता वाढवण्याचा प्रयत्न करत असते.त्याचप्रमाणे केवळ एक दिवस अभ्यास करून एकाग्रता वाढणार नाही.त्यात सातत्य असले पाहिजे.वाचन संस्कृती व लेखन संस्कृती खूप महत्वाची असून आताचे युग हे डिजिटल युग आहे.बऱ्याचदा मोबाईलमुळे आपले लक्ष विचलित होते.त्यामुळे एक सलग 18 तास अभ्यास करत असताना किती तास मोबाईल बंद ठेवतो यालाही महत्त्व आहे.आपल्याला काही उद्दिष्ट पूर्ण करायचे असेल तर काही एक प्रेरणा घेऊन अभ्यास करणे गरजेचे आहे.

गेल्या 15 वर्षांपासून 18 तास अभ्यास अभियान राबावले जात असल्याचे डॉ.विजय खरे यांनी यावेळी नमूद केले.तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गोखले इन्स्टिटयूट येथील काळे मेमोरिअल लेक्चरचा दाखला देऊन डॉ.खरे म्हणाले,एखाद्या व्यक्तीकडे खूप पदव्या आहेत.म्हणून ती व्यक्ती शहाणी आहे का ? तर नाही. तसेच एखाद्या व्यक्तीकडे डिग्री आहे, ज्ञान आहे आणि नैतिकता आहे .तरी सुध्दा ती व्यक्ती शहाणी नाही तर या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये ज्या व्यक्तीकडे शिक्षण, नैतिकता आहे आणि ज्या व्यक्तीने शिक्षण आणि नैतिकतेचा वापर समाज उपयुक्ततेसाठी केला असेल तीच व्यक्ती शहाणी आहे,असे बाबासाहेब आंबेडकर सांगतात.त्यामुळे येथे 18 तास अभ्यास करून विद्यार्थ्यांनी निश्चितच त्यांचे ध्येय प्राप्त करावे .मात्र या अभ्यासातून निर्माण होणाऱ्या उर्जेचा वापर ते समाजासाठी करत नाहीत तोपर्यंत त्याचा उपयोग होणार नाही.हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे,असेही खरे यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे संयोजन डॉ.बाबासाहेब आंबेडकर पोस्ट-पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडन्टस् असोसिएशनचे अध्यक्ष अमोल सरोदे यांच्यासह सागर सोनाकांबळे यांनी केले.कार्यक्रमात डॉ.विलास आढाव,डॉ.सदानंद भोसले, डॉ. सुनील धिवार आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.किरण भद्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading